- पावसात मोबाईल भिजल्यास त्वरित फोन स्विच ऑफ करणे अत्यंत आवश्यक आहे
- भिजलेला मोबाईल चार्जिंगला लावणे टाळावे, कारण यामुळे फोनमध्ये मोठा बिघाड होण्याची शक्यता असते
- फोन सुकवण्यासाठी कधीही हेअर ड्रायरचा वापर करू नये, कारण गरम हवा आणि दाबाने पाणी आत जाऊ शकते
सध्या पावसाचा जोर सगळीकडेच वाढला आहे. अशा वेळी आपण कधी छत्री तर कधी रेनकोट घेवून बाहेर पडत नाही. अशा वेळी जर पाऊस आला तर आपली धांदल उडते. अशा वेळी आपल्यासोबत असलेल्या वस्तू भिजण्याची भीती असते. त्यात जर मोबाईल जवळ असेल तर तो भिजण्याची चिंता आपल्याला जास्त असते. पण चिंता करून नका. जर पावसात तुमचा मोबाईल भिजला तर तो घरच्या घरी ठिक करता येतो. त्यासाठी काही सोप्या घरगुती टिप्स आहेत. त्या फॉलो केल्यात तर तुमच्या मोबाईलला काही होणार नाही. या टिप्स कोणत्या ते आपण आता जाणून घेणार आहोत.
पाऊस हा तसा सगळ्यांनाच आवडतो. पण हा ऋतू आपल्यासोबत अनेक अडचणीही घेऊन येतो. बऱ्याचदा अचानक आलेल्या पावसामुळे खिशातील मोबाईल पूर्णपणे ओला होतो. अशा वेळी अनेक जण घाबरून जातात. अशा स्थितीत ते घाईघाईत काही चुका करताना दिसतात. जर या चुका केल्या तर चांगला फोन खराब होण्याची दाट शक्यता असते. जर तुमचा मोबाईल पावसात भिजला, तर काय कराल? तर सर्वात आधी न घाबरता तो त्वरित 'स्विच ऑफ' करा. फोन आधीच बंद असेल, तर तो चालू करण्याची चूक अजिबात करू नका. फोन सुरू राहिल्यास पाणी आत जाऊन शॉर्ट सर्किट होऊ शकते. तसं झाल्यास मोबाईलचा मदरबोर्ड जळण्याची भिती असते.
काही जण त्या पेक्षा ही मोठी चूक करतात. मोबाईल चालू आहे की नाही, हे पाहण्यासाठी अनेक जण तो लगेच चार्जिंगसाठी लावतात. ही तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकते. ओला फोन चार्जिंगला लावणे हे अतिशय चुकीचे आहे. तसं केल्यास त्यात मोठा बिघाड होऊ शकतो. ऐवढेच काय तर त्या मोबाईलचा स्फोट होऊ शकतो. याशिवाय, फोन सुकवण्यासाठी कधीही 'हेअर ड्रायर'चा वापर करू नका. ड्रायरच्या गरम हवेमुळे फोनमधील प्लास्टिकचे भाग आणि स्क्रीन वितळू शकते. तसेच, ड्रायरच्या हवेच्या दाबाने पाणी फोनच्या अधिक आत जाऊ शकते.
फोन बंद केल्यानंतर सर्वात आधी एक गोष्ट नक्की करात. लगेचच सिम ट्रे बाहेर काढून सिम कार्ड आणि मेमरी कार्ड बाजूला ठेवा. जर तुमच्या फोनची बॅटरी निघण्यासारखी असेल, तर तीही काढून घ्या बाजूला ठेवा. यामुळे फोनमध्ये हवा खेळती राहील. त्यानंतर एका स्वच्छ, सुक्या सुती कपड्याने किंवा टिश्यूपेपरने मोबाईल स्क्रीन, बॅक पॅनल आणि कडा चांगल्या पुसून घ्या. त्यातून फोन कोरडा होईल. त्याच वेळी फोन जास्त हलवू नका. अन्यथा बाहेरील पाणी आत जाण्याची शक्यता वाढते. या सर्व गोष्टी केल्यास तुमचा मोबाईल पहिल्या प्रमाणेच काम करेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world