
नवरात्रीचा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या नऊ दिवसांमध्ये देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. अनेक भाविक या काळात उपवासही करतात. उपवास ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून, त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. उपवासाच्या काळात सात्विक भोजन केले जाते. जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. यामुळे पचनसंस्था सुधारते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. नवरात्रीचा उपवास केल्याने शरीराला मिळणाऱ्या प्रमुख फायद्यांविषयी जाणून घेऊया.
पचनसंस्थेला आराम:
उपवासाच्या काळात फळे, दूध, साबुदाणा, शिंगाड्याचे पीठ आणि हलके पदार्थ खाल्ले जातात. हे पदार्थ पचायला सोपे असल्यामुळे पचनसंस्थेला आराम मिळतो. त्यामुळे गॅस आणि अपचनासारख्या समस्यांपासून सुटका मिळते. ज्यांना पोटाचे विकार आहेत, त्यांच्यासाठी हलका आहार अधिक फायदेशीर ठरतो.
वजन नियंत्रणात मदत:
उपवासात फळे आणि उकडलेले पदार्थ खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर या काळात फळांचे सेवन केल्याने तुमचे 'वेट लॉस जर्नी' सोपी होऊ शकते.
नैसर्गिक 'डिटॉक्सिफिकेशन':
नवरात्रीच्या उपवासात हलके आणि पौष्टिक पदार्थ खाल्ल्याने शरीरात जमा झालेले विषारी घटक बाहेर काढले जातात. यामुळे यकृत, मूत्रपिंड आणि आतड्यांची स्वच्छता होण्यास मदत होते. या प्रक्रियेमुळे शरीर निरोगी राहते आणि नैसर्गिकरित्या 'डिटॉक्स' होते.
मानसिक शांतता:
उपवासाच्या काळात पूजा, ध्यान आणि भजन-कीर्तन यामध्ये जास्त वेळ घालवला जातो. यामुळे मानसिक ताण आणि चिंता कमी होते, ज्यामुळे मन शांत राहते.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते:
सात्विक भोजन आणि संयमित जीवनशैलीमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. फळे, सुका मेवा आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. यामुळे शरीराला रोगांशी लढण्याची ताकद मिळते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world