देशभरात भीषण उकाडा जाणवत आहे. अनेक राज्यांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. अशात कुलर, पंखे आणि एसी वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र एसीबाबत लोकांच्या मनात अनेक संभ्रम आहेत. सर्वात प्रचलित गैरसमज म्हणजे एसी फक्त १८ अंश सेल्सिअसवर सेट केल्यावरच चांगलं कूलिंग देतो.
ग्राहकांचा संभ्रम दूर करण्यासाठी दिली महत्त्वपूर्ण माहिती...
भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाने हा संभ्रम दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. मंत्रालयानुसार, एसी २४ डिग्री सेल्सिअरवर सेट केल्याने खोलीत चांगला थंडावा होतो आणि कमी ऊर्जा वापरली जाते. परिणामी विजेचं बिल कमी येतं. तापमानातील एक अंश वाढीमुळे अंदाजे ६ टक्के विजेची बचत होऊ शकते. याचा अर्थ असा की, १८ अंशांऐवजी २४ अंशांवर काम केल्यास, तुम्ही कोणत्याही गैरसोयीशिवाय तुमच्या वीज बिलात लक्षणीय बचत करू शकता.
आणखी एक मोठा संभ्रम स्टँडबाय मोडबाबत आहे. अनेकांना वाटतं की, टीव्ही किंवा एसी रिमोटने बंद केल्यामुळे तो फार वीज वापरत नाही. मात्र प्रत्यक्षात स्टँडबाय मोडमध्येही ही उपकरणं सातत्याने वीज वापरत असतात. मंत्रालयाने सल्ला दिला आहे की, एसी आणि टीव्हीचा वापर झाल्यानंतर प्लग भितींवरील सॉकेटमधून काढून ठेवा. यामुळे अनावश्यक वीज वापरली जात नाही.
उन्हाळ्याच्या दिवसात ऊर्जेची बचत करणं आवश्यक आहे. मंत्रालयाने नागरिकांना आवाहन केलं आहे की, एसीचं तापमान २४ डिग्रीपर्यंत ठेवा. खिडकीवरील पडदे लावून घ्या, ज्यामुळे थंडावा आत रोखला जाईल. एसीचा फिल्टर वेळोवेळी स्वच्छ करा, ज्यामुळे त्याची कार्यक्षमता अबाधित राहील.