राहुल तपासे, सातारा:
Sayaji Shinde On NCP Merger: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची घोषणा होणार होती, तशी चर्चा झाली होती असं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सांगत आहेत. मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील मुख्य नेत्यांचा विलिनीकरणाला मोठा विरोध दिसत आहे. अशातच अजित पवार यांचे निकटवर्तीय, प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदेंनी एक महत्त्वाचे विधान केले आहे.
काय म्हणाले सयाजी शिंदे?
"अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्र निःशब्द झाला आहे. काही सुचत नाही पण आज सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. काय बोलावे काही कळत नव्हते. शरद पवार यांची देखील भेट घेतली. मला असं वाटतं कीमहाराष्ट्रच्या भल्या साठी दोन्ही राष्ट्रावादी एकत्र आल्या पाहिजे. निवडणुकीवेळी, प्रचारावेळी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा होत्या," असं सयाजी शिंदे म्हणाले.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात...
तसेच "या निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या फक्त फॉर्मॅलिटी राहिली होती. असं असताना अचानक असं काही घडल्याने महाराष्ट्राच्या दृष्टीने वाईट झालं. दादांचा जो उमदा निर्णय घेण्याचा स्वभाव होता तो महाराष्ट्राच्या भल्यासाठी पुन्हा यावा. त्या दृष्टीने दादांचं स्वप्न पूर्ण झाले पाहिजे. ताकत वाढवायची असेल तर एकत्र यावे लागेल," अशी इच्छाही सयाजी शिंदे यांनी व्यक्त केली.