योगेश शिरसाट, अकोला: अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील हातरूण गावात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली असून गावातील 14 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मोर्णा नदीत पोहण्यासाठी गेला असता त्या मुलाला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. विजय गणेश कराळे असं मृत्यू विद्यार्थ्याचे नाव आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समोर आलेल्या माहितीनुसार, सोमवार (ता. 2 जून) रोजी बाळापूर तालुक्यातील हातरुण गावात 14 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. गणेश कराळे हा मोर्णा नदीत पोहण्यासाठी गेला होता. यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पोहता पोहता बुडाला यामध्येच त्याचा दुर्दैवी अंत झाला. याबाबतची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच मृतदेह बाहेर काढला.
दरम्यान ही घटना फक्त अपघात नसून लघुपाटबंधारे विभागाच्या धक्कादायक हलगर्जीपणाचा परिणाम असल्याचा ठाम आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या घटनेमुळे हातरुण गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती उरळ पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. या घटनेने मुलाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दुसरीकडे, रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर येथील तळ्यात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आदेश दत्ताराम घडशी असं 17 वर्षीय या युवकाचं नाव आहे असून तो मूळचा देवरूखचा आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसात करण्यात आली आहे. आदेश सोमवारी आपल्या मित्रांसोबत तालुक्यातील सोमेश्वर तळे येथे आला होता. दुपारनंतर तो तळ्यात पोहण्यास उतरला. पोहताना अचानक तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला.
आदेश बुडत असल्याचं लक्षात येताच मित्रांनी आरडाओरडा केला. त्याबरोबर स्थानिकांनी आदेशला वाचविण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या. तोपर्यंत आदेश पाण्याच्या तळाशी गेला होता. तरुणांनी त्याला पाण्यातून बाहेर काढलं. बेशुद्धावस्थेत असलेल्या आदेशला तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आदेशला तपासून मृत घोषित केलं. त्याच्या पश्चात आई, वडील असा परिवार आहे.