योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola Teacher News : कुंभार एखाद्या कच्च्या मातीला आकार देऊन मडकं बनवतो. त्याप्रकारे शिक्षक मुलांचं गुणकौशल्य पाहून त्याला आकार देतो. असे शिक्षण मिळणे कठीण असतात जे सर्व विसरून केवळ मुलांच्या भवितव्यासाठी झटत असतात. हे शिक्षक आपल्या मुलांच्या पाठीशी कायम असावेत असं कोणत्याही पालकांना वाटतं. अकोल्यातून असाच एक प्रकार समोर आला आहे. अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या एका शिक्षकाची बदली झाल्यामुळे अख्यं गाव गोळा झालं आहे. मुलींच्या एकमेव जिल्हा परिषदेच्या शाळेत असलेल्या शिक्षकांच्या बदलावर गावकऱ्यांकडून आक्षेप घेतला जात असून ही बदली मागे घ्यावी अन्यथा शाळेला कुलूप लावलं जाईल असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकाची बदली रद्द करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. मुलींच्या एकमेव जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक प्रवीण चिंचोळकर यांची नुकतीच प्रशासकीय बदली करण्यात आली आहे. मात्र गावकरी या बदलीला तीव्र विरोध दर्शवत आहे. ही बदली तातडीने रद्द करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे. गावातील ग्रामस्थांनी यासंदर्भात शिक्षणमंत्री, पालकमंत्री, आमदार आणि खासदार यांना निवेदन सादर केले असून, योग्य तो निर्णय न झाल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे. गावात ही एकमेव मुलींची शाळा असून सध्या केवळ चार शिक्षक कार्यरत आहेत. त्यातील तीन शिक्षकांची प्रशासकीय बदली झाली आहे. ज्यामध्ये प्रवीण चिंचोळकर यांचाही समावेश आहे. त्यामुळे शाळेतील शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुलींच्या शिक्षणावर विशेष लक्ष
चिंचोळकर सर गेल्या ८ वर्षांपासून शाळेत कार्यरत असून त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न करून मुलींचा बौद्धिक कौशल्य वाढला असून त्यांच्या कार्यशैलीमुळे शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता सुधारली आहे. सध्या इंग्रजी भाषेचं विशेष महत्त्व आहे. सर्व व्यवहार इंग्रजीतून होतो. याशिवाय इंग्रजी संभाषणामुळे नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतात. ही बाब लक्षात घेऊन चिंचोळकर सर मुलींसाठी इंग्रजीचे वेगळे वर्ग घेत होते. गेल्या काही वर्षात मुलींच्या आकलन क्षमतेत झालेला बदल आम्ही पाहिल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.
त्यामुळे त्यांची बदली रद्द करून त्यांना पूर्ववत शाळेतच कायम ठेवावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी एकमुखाने आवाज उठवत प्रशासनाला निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. "बदली रद्द न झाल्यास, गावकऱ्यांना शाळेला कुलूप ठोकावा लागेल आणि शाळा बंद करण्यास भाग पाडले जाईल," असा इशाराही दिला गेला आहे. या पार्श्वभूमीवर, स्थानिक प्रशासन आणि शिक्षण विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेणे अपेक्षित आहे. गावातील एकमेव शाळेचे भविष्य आणि विद्यार्थिनींचे शिक्षण अबाधित ठेवण्यासाठी योग्य निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा, अशी ग्रामस्थांची ठाम मागणी आहे.