शुभम बायस्कार, प्रतिनिधी
Amravati News: अमरावतीत चायनीजच्या गाड्यांवरून मोठा वाद निर्माण झाला असून भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी थेट 'लव्ह जिहाद'चा गंभीर आरोप केला आहे. अमरावती शहरातील खाद्यपदार्थांच्या गाड्यांच्या माध्यमातून लव्ह जिहादला खतपाणी मिळत असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केलाय. याप्रकरणी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तातडीने कारवाईची मागणी केली आहे. या नव्या आरोपामुळे शहरात सध्या मोठी चर्चा सुरू झाली असून राजकीय वातावरणही तापले आहे.
नेमकं प्रकरण काय?
नांदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर दोन मुस्लिम व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. यातील आरोपींची पंचवटी चौकात चायनीजची गाडी असून, याच गाडीच्या माध्यमातून त्यांनी संबंधित महिलेशी संपर्क साधला, तिला विश्वासात घेतले आणि नंतर तिच्यावर अत्याचार केले असा आरोप अनिल बोंडे यांनी पत्रात केला आहे. या एका घटनेचा संदर्भ देत त्यांनी शहरातील इतर चायनीज गाड्यांच्या व्यवहारांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
( नक्की वाचा : Nashik News: नाशिकच्या मुलीला मलेशियात पाठवण्याचा होता डाव; TCS धर्मांतर प्रकरणात 'मालेगाव लिंक'चा मोठा खुलासा )
खासदारांचे गंभीर आरोप आणि मागणी
अनिल बोंडे यांच्या म्हणण्यानुसार, पंचवटी, गाडगे नगर, शेगाव नाका आणि नवाथे यांसारख्या मुख्य भागांतील गाड्यांवर केवळ खाद्यपदार्थच नव्हे, तर दारू आणि मादक पदार्थांचे वितरण देखील केले जाते. या गाड्यांमुळे लव्ह जिहादसारख्या घटनांना वेग येत असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे पोलीस आणि महानगरपालिकेने संयुक्तपणे या गाड्यांची तपासणी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
गाड्यांसाठी नवे नियम लावण्याची मागणी
खासदार बोंडे यांनी प्रशासनाला काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने खालील मुद्द्यांचा समावेश आहे:
1. प्रत्येक गाडीवर मालकाचे नाव स्पष्टपणे लिहिलेले असावे.
2. गाडी चालवणाऱ्या व्यक्तीकडे त्याचे आयडी कार्ड असणे अनिवार्य करावे.
3. प्रत्येक गाडीवर ग्राहकांसाठी डिजिटल पेमेंटची सुविधा असावी, जेणेकरून व्यवहारांची नोंद राहील.
4. ज्या व्यक्तींवर गुन्हे दाखल आहेत, त्यांना खाद्यपदार्थांची गाडी लावण्याची परवानगी देऊ नये.
5. रस्त्यावर टेबल-खुर्च्या लावून रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या गाड्यांवर कारवाई करावी.
प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार
अमरावतीमधील हॉकर्स असोसिएशनने यापूर्वी अनेकदा महानगरपालिका आणि पोलीस आयुक्तांकडे तक्रारी केल्या आहेत, मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असेही बोंडे यांनी पत्रात नमूद केले आहे. पंचवटी चौकात नारळ पाणी विकणाऱ्या एका मुस्लिम विक्रेत्याच्या दादागिरीचा संदर्भ देत त्यांनी अशा घटनांमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे म्हटले आहे. आता या पत्रावर पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.