शुभम बायस्कार, प्रतिनिधी
Amravati Hanuman Temple Dispute: अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात हनुमान मंदिराच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामावरून मोठा गदारोळ निर्माण झाला. एका विशिष्ट समुदायातील महिलांनी हे काम रोखल्याने परिसरात तणावाचे वातावरण आहे. वडनेर गंगाई येथे सुरू असलेल्या या शासकीय कामाला मुस्लिम महिलांनी कडाडून विरोध दर्शवत घोषणाबाजी केल्याने या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे. भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी या घटनेनंतर आक्रमक पवित्रा घेतला असून शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
काय आहे प्रकरण?
वडनेर गंगाई येथील बजरंग बली मंदिराच्या आवार भिंतीचे बांधकाम करण्यासाठी खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून 10 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला होता. अमरावती जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन विभागामार्फत हे काम सुरू करण्याचे रितसर आदेशही दिले होते.
मात्र, हे काम सुरू झाल्यापासूनच त्याला विरोध होत असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी सकाळी जेव्हा नियमितपणे बांधकामाचे काम सुरू झाले, तेव्हा मुस्लिम महिलांच्या एका गटाने तिथे धाव घेत काम बंद पाडले. यावेळी चिथावणीखोर घोषणाबाजी करण्यात आल्याचाही आरोप मंदिर व्यवस्थापनाने केला आहे.
( नक्की वाचा : Ram Navami Rally: खळबळजनक! श्रीरामपूरमध्ये राम नवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक, मौलानांसह 12 जणांवर गुन्हा )
न्यायालयीन प्रक्रिया आणि जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
या बांधकामाच्या विरोधात काही नागरिकांनी यापूर्वी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करताना जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या 2 आठवड्यात योग्य तो निर्णय घ्यावा, असे स्पष्ट निर्देश दिले होते. न्यायालयाच्या प्रक्रियेनंतर प्रशासकीय आदेशानुसार काम सुरू असतानाच अचानक महिलांना पुढे करून हे काम थांबवण्यात आल्याने गावकरी आणि मंदिर प्रशासनात संतापाची लाट उसळली आहे.
या गोंधळामुळे दोन गटात जोरदार वादावादी झाली असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला पाचारण करण्यात आले आहे.
अनिल बोंडे यांचा गंभीर आरोप
या संपूर्ण प्रकारानंतर भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून आपला निषेध नोंदवला आहे. काही जण हनुमान मंदिराच्या कामात वारंवार अडचणी निर्माण करत होते, म्हणूनच तिथे संरक्षक भिंत बांधण्यासाठी 10 लक्ष रुपयांचा निधी देण्यात आला होता, असे बोंडे यांनी स्पष्ट केले. जाणीवपूर्वक मुस्लिम महिलांना समोर करून हे शासकीय काम थांबवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे. सरकारी कामात अडथळा आणणे हा गुन्हा असून अशा प्रवृत्तींना थारा देऊ नका, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
घटनेच्या ठिकाणी झालेल्या राड्यामुळे मंदिर व्यवस्थापनाने आता पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. चिथावणीखोर घोषणाबाजी करणाऱ्या आणि दगडफेक करण्याचे आवाहन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी गावकरी करत आहेत. शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सध्या येवदा पोलीस ठाण्यात सुरू असल्याचे समजते. या प्रकरणावरून अमरावती जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून प्रशासनासमोर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.