राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ आज राजभवनात शपथविधी घेणार आहेत. त्यांच्या मंत्रिपदावर शिक्कामोर्तब झाला असून भुजबळांना धनंजय मुंडे यांचेच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय दिलं जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दरम्यान त्यांच्या मंत्रिपदाच्या वृत्तानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी छगन भुजबळांच्या शपथविधीला विरोध दर्शविला आहे. एका भ्रष्ट मंत्र्यांच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार? असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे. राजकारणात सभ्य माणसं मिळत नाहीत का? असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अंजली दमानिया काय म्हणाल्या?
छगन भुजबळ मंगळवारी सकाळी 10 वाजता राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेणार ? वाह फडणवीस वाह ! म्हणजे एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार? जनता अशीच भरडली जमणा? की हा माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे, की तुम्ही आमच काहीच वाकड करू शकत नाही ? असा काय नाईलाज आहे ? की सभ्य माणसं मिळत नाहीत राजकारणात ? आणि हो, हेच भुजबळ जेव्हा जेल मधे होते, तेव्हा एक अगदी बिचाऱ्या सारखा फोटो माध्यमांमध्ये दाखवला जायचा. तेव्हा छातीत कळ यायची. मग आता ठणठणीत ? किळस वाटतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची. कालच्या घोषणा आठवतात ? “भ्रष्टाचारीयो पर कारवाई के लिए, अब की बार 400 पार”, “भ्रष्टाचार के खिलाफ मोदी सरकार के बडे कदम”, हा आहे का तो बडा कदम ?