आकाश सावंत, प्रतिनिधी
Khazana Bawdi Beed History: बीड जिल्ह्यातल्या ऐतिहासिक कुशीत दडलेल्या एका प्राचीन विहिरीने आता आधुनिक विज्ञानालाही चक्रावून सोडले आहे. तब्बल 450 वर्षांपूर्वी केवळ दगड-मातीत बांधलेली ही विहीर चक्क पृथ्वी आणि चंद्राच्या अंतराचे गणित सांगते, यावर तुमचा विश्वास बसेल का? संशोधकांनी नुकत्याच केलेल्या एका दाव्याने संपूर्ण राज्याचे लक्ष बीडच्या या खजाना बावडीकडे वेधले आहे.
केवळ पाणी साठवण्यासाठी नव्हे, तर अवकाशातील ग्रहांची स्थिती आणि पृथ्वीचा परीघ मोजण्याचे अद्भूत तंत्र या विहिरीच्या बांधकामात दडलेले आहे. पाच शतकांनंतरही ही विहीर आपल्या पूर्वजांच्या प्रगत खगोलशास्त्रीय ज्ञानाची साक्ष देत उभी आहे.
निजामशाही काळातील अभेद्य वारसा
बीड शहरापासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर असलेली ही खजाना बावडी 15 व्या शतकातील निजामशाही काळातील वैभव आहे. सेनापती सलाबत खान यांनी महान आर्किटेक्ट भट्टाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली या विहिरीची निर्मिती केली होती.
दिसायला ही विहीर सामान्य वाटत असली, तरी तिची प्रत्येक भिंत आणि प्रत्येक पायरी एका विशिष्ट गणितावर आधारित आहे. शेतीला पाणी मिळावे हा जरी प्राथमिक उद्देश असला, तरी या विहिरीच्या रचनेत संपूर्ण पृथ्वीचा नकाशा आणि अंतराळ विज्ञानाचे सूत्र दडलेले असल्याचे आता समोर आले आहे.
( नक्की वाचा : Beed News: बीडमध्ये बिल्डरला चक्क महिला बाऊन्सर्सचा पहारा! वाचा कुणाच्या दहशतीमधून घेतला निर्णय? )
विहिरीच्या व्यासात दडलंय पृथ्वीचं गुपित
संशोधक सम्राट राहुल सरोदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या विहिरीचा सखोल अभ्यास केला. या अभ्यासानंतर काही थक्क करणारे आकडे समोर आले. खजाना बावडीच्या आतील वर्तुळाचा व्यास हा 12 मीटर 547 सेंटीमीटर इतका आहे. हे मोजमाप पृथ्वीच्या व्यासाशी म्हणजेच 12,547 किलोमीटर या आकड्याशी तंतोतंत जुळते.
इतकेच नाही, तर विहिरीचा आतील परिघ 39 मीटर 419 सेंटीमीटर आहे, जो पृथ्वीच्या विषुववृत्तीय परिघाच्या 39,419 किलोमीटर या आकड्याचे साम्य दर्शवतो. त्या काळी कोणत्याही आधुनिक उपकरणाशिवाय इतकी अचूक मोजमापे बांधकामात कशी उतरवली गेली, हा मोठा प्रश्न आहे.
( नक्की वाचा : Beed News: उंची लहान पण कीर्ती महान! जगातील सर्वात बुटक्या म्हशीची परळीत चर्चा, किंमत ऐकून व्हाल थक्क )
चंद्राच्या कला आणि 15 पायऱ्यांचे रहस्य
या विहिरीचे बाह्य वर्तुळ आणि त्याची मोजलेली लांबी 3,57,723 किलोमीटरच्या आधुनिक मोजमापाशी जुळते, जे पृथ्वी आणि चंद्रातील सर्वात कमी अंतर मानले जाते. या विहिरीच्या बांधकामात असलेल्या 15 पायऱ्या देखील उगाच बांधलेल्या नाहीत.
चंद्राच्या अमावस्या ते पौर्णिमा या दरम्यानच्या 15 कलांचे त्या प्रतिनिधित्व करतात. म्हणजेच, ही विहीर म्हणजे दगडात कोरलेले एक जिवंत कॅलेंडर आणि अंतराळ मोजण्याचे साधन आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
निसर्गाचा चमत्कार आणि संवर्धनाची गरज
गेल्या 500 वर्षांच्या इतिहासात ही विहीर केवळ 3 वेळा कोरडी पडली आहे. विहिरीतील पाण्याची पातळी कायमस्वरूपी 4.5 फूट इतकीच स्थिर राहते. पाणी कधीही वर येत नाही की कधी पूर्ण संपत नाही.
या पाण्यातून आजही हजारो हेक्टर शेती फुलत असून बीडला पिण्याचे पाणी मिळते. सामाजिक कार्यकर्ते राहुल मस्के आणि इतर नागरिकांनी या ऐतिहासिक आणि वैज्ञानिक ठेव्याचे योग्य संवर्धन करण्याची मागणी केली आहे. पूर्वजांचे हे अफाट ज्ञान येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या खजाना बावडीला राष्ट्रीय वारसा म्हणून जपण्याची गरज आता व्यक्त होत आहे.