आकाश सावंत, बीड: बीडमधील ज्ञानराधा मल्टी स्टेट बँकेत अनेक गुंतवणूकदारांचे पैसे अडकून राहिले आहेत. ज्ञानराधा मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिटमुळे शेतकरी, कामगार, कष्टकरी, छोटे व्यापारी असे ग्रामीण भागातील गुंतवणूकदार अडचणीत आहेत. आजही अनेक ठेवीदार पैसे मिळवण्यासाठी धडपडत असून बँकेच्या फेऱ्या मारत आहेत. अशातच बीडमधून एक दुर्दैवी घटना समोर आली असून बँकेत अडकलेले पैसे मिळत नसल्याने ठेवीदाराने बँकेच्या गेटवर आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समोर आलेल्या माहितीनुसार, बीडच्या गेवराई तालुक्यातील खळेगावात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठेवीदार सुरेश आत्माराम जाधव यांनी छत्रपती मल्टीस्टेट बँकेच्या गेटला गळफास घेऊन आत्महत्या केली. जाधव यांच्या छत्रपती मल्टीस्टेट बँकेत 11 लाख आणि ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये 5 लाख रुपये अडकले होते.
सुरेश जाधव यांच्या मुलीचा विवाहसोहळा निश्चित झाला होता, त्यामुळे मुलीच्या लग्नासाठी त्यांना पैशांची गरज होती. मात्र सतत बँकेच्या फेऱ्या मारूनही त्यांना रक्कम परत मिळाली नाही. या मानसिक त्रासामुळे त्यांनी बँकेच्या गेटवर गळफास घेत आपले आयुष्य संपवले. रात्री उशिरा कुटुंबासह बँकेत गेलेले जाधव, काही वेळातच बँकेच्या गेटवर मृत अवस्थेत आढळले. या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मल्टीस्टेट बँकांची विश्वासार्हता पुन्हा एकदा समोर आली आहे.
(नक्की वाचा- एका भविष्यवाणीने खळबळ! धडाधड विमान आणि हॉटेल बुकिंग रद्द, 5जुलैला काय होणार?)