- भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ बसस्टॉपवर एका विद्यार्थ्याच्या मोबाईलला अचानक आग लागली होती
- विद्यार्थ्याच्या हातातील मोबाईलमध्ये धूर निघू लागल्यावर काही सेकंदांत त्याला आग लागून तो जळून खाक झाला
- सकाळपासून उष्णतेने त्रस्त असलेल्या बसस्टॉपवर शालेय विद्यार्थी आणि प्रवाशांची मोठी गर्दी होती
अभय भुते
मोबाईलला आग लागल्याच्या घटना या आधी ही घडल्या आहेत. पण भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ इथली घटना थोडी वेगळी आहे. दुपारच्या सुमारास सुर्य आग ओकत होता. त्यामुळे अनेक विद्यार्थी अड्याळ बसस्टॉपवर भंडाऱ्याकडे जाणाऱ्या बसची वाट पाहत उभे होते. त्यातील एका विद्यार्थ्याच्या हातातील मोबाईलने अचानक पेट घेतला. कुणाला काही समजण्याच्या आत हा प्रकार घडला. त्यामुळे बसस्टॉपवर एकच खळबळ उडाली. विद्यार्थ्यांची पळापळ झाली.
तो विद्यार्थी बसची वाट पाहत होती. त्याच वेळी काही क्षणांतच मोबाईलमधून धूर निघू लागला. बघता बघता मोबाईलला आग ही लागली. या आगीत तो मोबाईल जळून खाक झाला. सकाळपासूनच बसस्टॉप परिसरात शालेय विद्यार्थी व प्रवाशांची मोठी गर्दी होती. त्यातच प्रचंड तापमान होते. याच दरम्यान एका विद्यार्थ्याच्या हातातील मोबाईल अचानक गरम होऊ लागला. विद्यार्थ्याला काही समजण्याच्या आत मोबाईलमधून धूर निघू लागला. काही सेकंदांतच मोबाईलने पेट घेतला.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बसस्टॉपवर भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अनेक विद्यार्थी घाबरून इकडे-तिकडे पळू लागले. या आगीत मोबाईल पूर्णपणे जळून खाक झाला. मोबाईल कव्हरमध्ये ठेवलेले सुमारे दोन हजार रुपयेही आगीत भस्मसात झाले. सुदैवाने या घटनेत कोणी ही जखमी झाले नाही. किंवा कुणाला इजा झाली नाही. मात्र काही क्षण उशीर झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रचंड उष्णतेचा परिणाम आता इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरही होत आहे का अशी चर्चा या निमित्ताने होत आहे. नक्की आग कशाने लागली हे मात्र स्पष्ट झालेले नाही.