Marathwada Railway News : मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील परभणी-मुदखेड या अत्यंत वर्दळीच्या दुहेरी रेल्वे मार्गाचा कायापालट होणार आहे. भारतीय रेल्वेने या मार्गाच्या आधुनिकीकरणासाठी तब्बल 163 कोटी रुपयांच्या भव्य प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे भविष्यात या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेससारख्या अतिवेगवान गाड्या चालवणे अधिक सुलभ होणार आहे.
अत्याधुनिक वीज प्रणालीमुळे वाढणार रेल्वेचा वेग
या 163 कोटी रुपयांच्या प्रकल्पाअंतर्गत 164 रेल्वे ट्रॅक किलोमीटर मार्गावरील जुनी वीज यंत्रणा पूर्णपणे बदलली जाणार आहे. सध्या या मार्गावर कार्यरत असलेली 1x25 केव्ही इलेक्ट्रिक ट्रॅक्शन प्रणाली काढून त्याऐवजी अत्याधुनिक आणि उच्च क्षमतेची 2x25 केव्ही प्रणाली बसवली जाईल.
वाढीव वीजभार हाताळण्यासाठी वीज उपकेंद्रे आणि इतर पायाभूत सुविधांचेही आधुनिकीकरण केले जाणार आहे. यामुळे रेल्वेगाड्यांना विनाअडथळा आणि अखंड वीजपुरवठा मिळेल, ज्यामुळे तांत्रिक बिघाड कमी होऊन गाड्यांचा वेग वाढेल.
( नक्की वाचा :महाराष्ट्रातील 'या' 5 जिल्ह्यांमध्ये सुरू होणार नवीन न्यायालये; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय! )
औद्योगिक आणि व्यापारी क्षेत्राला मोठा फायदा
परभणी-मुदखेड हा रेल्वे मार्ग भारतीय रेल्वेच्या अत्यंत व्यस्त मानल्या जाणाऱ्या 'हायली युटिलाइज्ड नेटवर्क' (HUN रूट-9) चा भाग आहे. हा मार्ग अजमेर, इंदूर, खंडवा, अकोला, पूर्णा, मुदखेड, सिकंदराबाद, मेहबूबनगर आणि धोन या महाराष्ट्रासह इतर राज्यांतील प्रमुख शहरांना जोडतो. त्यामुळे या मार्गाची क्षमता वाढल्याने केवळ प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार नाही, तर मालवाहतुकीलाही मोठी गती मिळून स्थानिक व्यापार आणि उद्योगांना मोठा फायदा होणार आहे.
( नक्की वाचा : Kolhapur News: कोल्हापुरात साकारणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम; राज्य सरकारची मंजुरी, वाचा सर्व प्लॅन )
वंदे भारत धावणार अन् मालवाहतुकीचे उद्दिष्ट गाठणार
मार्गाच्या या आधुनिकीकरणामुळे उच्च वेगाने धावणाऱ्या रेल्वेगाड्या अधिक सुरक्षितपणे चालवता येतील. तसेच मालवाहतूक गाड्यांची क्षमता वाढल्याने भारतीय रेल्वेला 2029-30 पर्यंत 3000 दशलक्ष टन मालवाहतुकीचे ठेवलेले राष्ट्रीय उद्दिष्ट गाठणे सोपे जाणार आहे. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील रेल्वे पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी हा प्रकल्प एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.