ओंकार कुलकर्णी, धाराशिव: भारतीय जनता पक्षाचे नेते मंत्री नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका काही थांबत नसल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच धाराशिवमध्ये नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महायुतीमध्येच मिठाचा खडा पडल्याचे दिसत आहे. नितेश राणे यांच्या या वक्तव्यावरुन जोरदार टीका होत असतानाच आता नारायण राणे यांनीही त्यांचे कान टोचले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणालेत नारायण राणे?
'मुख्यमंत्री हा कोणाचा बाप नसतो. मुख्यमंत्री जनतेचा सेवक असतो. मी नितेशला समज दिली आहे. मी मुख्यमंत्री असतानाही मी सांगायचो की मला साहेब वगेरे म्हणून नका, सेवक म्हणा..' असे म्हणत नारायण राणे यांनी मुलगा नितेश राणेंच्या वक्तव्यावरुन नाराजी व्यक्त केली आहे. तसेच कोणाचा निधी अडवणं हे चुकीचं आहे, त्याबाबतही मी सूचना देणार आहे असंही ते म्हणाले. आज (11, जून) ते धाराशिवमध्ये तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
निलेश राणे यांनीही दिली होती समज..
याआधी मंत्री नितेश राणे यांचे बंधू शिवसेना आमदार निलेश राणे यांनीही त्यांना या वक्तव्यावरुन समज दिली होती. नितेशने जपून बोलावे. मी भेटल्यावर बोलेननच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे, पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही, असं ट्वीट निलेश राणे यांनी केले होते.
नक्की वाचा - Godavari River : तेलंगणाच्या सीमेवरील धरणात सहा मुलं बुडाली, नदीच्या किनाऱ्यावर कुटुंबीयांचा आक्रोश
काय म्हणाले होते नितेश राणे?
दरम्यान, नितेश राणे यांनी धाराशिव दौऱ्यावर असताना केलेल्या वक्तव्यामुळे हा सगळा वाद निर्माण झाला होता. सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बसला आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. कोणी कितीही ताकद दाखवली, कोणीही कसेही नाचले तरी देशात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान आणि राज्यात देवेंद्र फडणवीस हेच खरे मुख्यमंत्री आहेत, असं नितेश राणे म्हणाले होते, ज्यावरुन त्यांना मुख्यमंत्र्यांनीही समज दिली होती.