अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर:
Chandrapur Tiger Attack: चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या १३ महिलांवर वाघाने केलेल्या अचानक हल्ल्यात ४ महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर या हल्ल्यात ९ महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाच वेळी वाघाच्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू होण्याची चंद्रपूरमधील ही पहिलीच घटना असल्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू
कवडूबाई दादाजी मोहुर्ले (वय,45) अनुबाई दादाजी मोहुर्ले (वय,46) संगीता संतोष चौधरी (वय,36) सुनीता कौशिक मोहुर्ले (वय,33) अशी वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. सकाळी सकाळी तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या असता या महिलांवर वाघाने अचानक झडप घातली. वाघाच्या या अमानुष हल्ल्यात निष्पाप महिलांचा बळी गेला.
परिसरात वाघांचा वावर वाढलेला असतानाही वन विभागाने स्थानिक नागरिकांना कोणतीही सुरक्षा किंवा पूर्वकल्पना दिली नव्हती का? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. वन विभागाच्या ढिम्म कारभारामुळेच आज चार कुटुंबांतील माता-भगिनी कायमच्या हिरावल्या गेल्या आहेत, अशा शब्दांत गावकऱ्यांनी आपला आक्रोश आणि राग व्यक्त केला.