Chhatrapati Sambhajinagar : 'पेड' तक्रारदार आणि खोटे ट्रॅप; RTO वसुली टोळीचा सर्वात घातक पॅटर्न

परिवहन विभागातील 'वसुली रॅकेट'मधून नवीन धक्कादायक खुलासे समोर आले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

Chhatrapati Sambhajinagar : परिवहन विभागातील 'वसुली रॅकेट'मधून नवीन धक्कादायक खुलासे समोर आले आहे. नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयातील तब्बल २४ मोटार वाहन निरीक्षकांनी एकत्र येत थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार करत रॅकेट कसे चालते याची लेखाजोखाच मांडला आहे. पण कारवाई काही झाली नाही. त्यातच याच रॅकेटमध्ये आणखी एक नवीन नाव समोर आलंय, ते म्हणजे गुड्डू सेठ... माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी याबाबत मोठे धक्कादायक खुलासे केले आहे. नेमकं कोण आहे गुड्डू सेठ आणि वसुली रॅकेटचे नवीन कारनामे काय आहेत पाहूया.

महसूल मंत्र्यांना दिलेलं पत्र मंत्रालयातून गहाळ? 

परिवहन विभागातील वसुली रॅकेटचा गेल्या दोन दिवसांपासून एनडीटीव्ही मराठीकडून पोलखोल केली जात आहे. आरटीओमधील मोटर वाहन निरीक्षकांच्या शंभर अधिकाऱ्यांनी महसूल मंत्र्यांना पत्र देऊन देखील कोणतीही कारवाई झाली नाही, याचा आम्ही खुलासा केला. आता अशाच आणखी 24 अधिकाऱ्यांचं लाचलुचपत विभागाला दिलेलं पत्र एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागले आहे. विशेष म्हणजे ज्या पद्धतीने महसूलमंत्र्यांनी या पत्राची दखल घेतली नाही, त्याच पद्धतीने लाच रुजवत विभागाने देखील या पत्राला केराची टोपली दाखवली असल्याचा आरोप आहे. पण यापेक्षा धक्कादायक म्हणजे महसूलमंत्र्यांना देण्यात आलेलं पत्र मंत्रालयातून गहाळ झाल्याचा खळबळजनक आरोप माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. 

Advertisement

मोटर वाहन निरीक्षकांनी नागपूर एसीबीच्या अधीक्षकांना पाठवलेल्या पत्रात देखील अनेक गंभीर गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. टोळीचा सर्वात घातक पॅटर्न म्हणजे, प्रामाणिक अधिकाऱ्यांनी नकार दिला की, त्यांच्याविरोधात 'पेड' म्हणजेच भाडोत्री तक्रारदार उभे करायचे. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत खोटे 'ट्रॅप' रचून त्या अधिकाऱ्यांना लाचखोरीच्या प्रकरणात अडकवायचे. जुलै २०२५ मध्ये कांद्री सीमा तपासणी नाक्यावर अशाच एका प्रामाणिक मोटार वाहन निरीक्षकाला अडकवण्याचा डाव रचला गेला होता. मात्र तो ट्रॅप फसल्याचे ताजे उदाहरण पत्रात दिले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणातील तक्रारदार हे अकोल्यातील टोळी प्रमुखाचेच खास मर्जीतील लोक होते. तर हे ट्रॅप लावण्यासाठी गुड्डू शेठ नावाचा व्यक्ती काम करत आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

नक्की वाचा - Omraje Nimbalkar: ओमराजे एकटे पडले, भावाने सोडली साथ? बंधू मकरंद राजेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

फक्त पत्रच नाही, तर या टोळीच्या दहशतीचे थेट पुरावे आता समोर येऊ लागले आहेत. आधी १०० मोटर वाहन निरीक्षकांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेले पत्र आणि आता २४ अधिकाऱ्यांचे एसीबीला गेलेले पत्र, या दोन्हीमध्ये एका गोष्टीचा प्रामुख्याने उल्लेख आहे. तो म्हणजे टोळीच्या वसुलीला विरोध केल्यास थेट गुंडांचा वापर केला जातो. सोलापूर जिल्ह्यातील नांदणी चेक पोस्टवरील डिसेंबर २०२५ मधील काही व्हिडिओ आता समोर आले आहेत. या ठिकाणी कार्यरत असलेल्या आरटीओ अधिकाऱ्यांनी जेव्हा अवैध वसुली करण्यास स्पष्ट नकार दिला, तेव्हा या टोळीने स्थानिक गुंडांना पाठवून तिथे मोठा धुडगूस घातला.

या टोळीतील संबंधित व्यक्ती आजही आपण उच्च पदावर असल्याप्रमाणे वागतात. याबाबत मुख्यमंत्री कारवाई करतील असं मला परिवहन मंत्र्यांनी आश्वासित केल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे, या माफिया टोळीचा मुख्य कारभार पुणे आणि नागपूर येथील खाजगी फ्लॅटवरून चालत असल्याचा दावा एसीबीला देण्यात आलेल्या पत्रात करण्यात आला आहे. तर अनेक तक्रारी करूनही ना कोणतेही कारवाई होते, ना टोळीला आशा कारवाईची भीती आहे. पण या वसुली टोळीचा वाढत हैदोस पाहून तरी सरकार काही पाऊलं उचलणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.