संकेत कुलकर्णी
आषाढी वारीसाठी यंदा प्रथमच पंढरपुरात मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. पालखी मार्गासह पंढरपूर शहरालगत तब्बल 52 मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र उभी केली आहेत. त्यामुळे साहजिकच मुख्यमंत्री वारकरी केंद्राच्या माध्यमातून यावर्षी वारकऱ्यांना मोफत वास्तव्यासह पायाभूत सुविधा मिळणार आहेत. या सुविधा केंद्राचा मोठा फायदा वारकऱ्यांना होणार आहे. आषाढी निमित्त लाखो भावीक पंढरपुरमध्ये दाखल होत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या वारीचे सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. याच वारीमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्राची उभारणी करण्याचे निश्चित झाले. याच मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्राची जबाबदारी ग्रामविकास विभागाकडे देण्यात आली. ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यातील पालखी मार्गासह पंढरपुरात 52 केंद्रे उभी केली आहेत.
मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून वारकरी भक्तांना निवाऱ्याची व्यवस्था, स्वच्छतागृहांची व्यवस्था, मसाज सेंटर , प्राथमिक उपचार सेंटर, अशा सर्व सुविधा मिळणार आहेत. याच सुविधांना मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रात चरणसेवा प्रकल्प असे नाव देण्यात आले आहे. ही सुविधा केंद्र फायद्याची ठरत आहेत. शिवाय एक हक्काचा निवाराही या माध्यमातून वारकऱ्यांना मिळाला आहे.
विशेष म्हणजे अशा वारकरी सुविधा केंद्रांना फलटण, लोणंद अशा पालखीतळांवर मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे इतर वारकरी भक्तांकडून आता असे मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र अधिकचे व्हावेत. अशी मागणी होताना दिसत आहे. सध्या वाखरी पालखीतळासह पंढरपूर शहराच्या चारही बाजूने मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र उभा केले आहेत. त्यामुळे वारकरी भक्तांना मोफत राहण्याची सुविधा यंदाच्या वारीत होते आहे.