मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आले होते. तिथून मुंबईकडे परतत असताना विमानतळावर आल्यानंतर त्यांच्या उड्डाणाला थोडा विलंब झाला. मात्र हाच विलंब एका महिलेसाठी जीवनदान देणारा ठरला आहे. नेमकं जळगाव विमानतळावर काय घडलं? वाचा सविस्तर...
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील शीतल बोरडे या किडनी विकाराने त्रस्त होत्या. किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करण्यासाठीच त्या विमानाने मुंबईकडे निघाल्या होत्या. किडनी ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियेसाठी शीतल याना तात्काळ मुंबईत पोहोचायचे होते. मात्र त्या विमानतळावर पोहोचण्याअधिच मुंबईकडे जाणारे विमान निघून गेल्याचे त्यांना समजले. आता वेळेत मुंबईला पोहोचणे त्यांच्यासाठी अशक्य होऊन बसले. मात्र त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चार्टर्ड विमान जळगाव येथून मुंबईकडे जाणार होते.
बोरडे यांची ही अडचण काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मंत्री गिरीश महाजन यांना समजली. महाजन यांनी या महिला आणि तिच्या पतीला आपल्या विमानातून मुंबईला घेऊन जाण्याची विनंती शिंदे यांना केली. क्षणाचाही विलंब न लावता शिंदे यांनी त्यासाठी होकार दिला. वेळ पडल्यास माझे दोन अधिकारी जळगावमध्ये थांबतील पण माझ्या लाडक्या बहिणीला मी मुंबईला सोबत घेऊन जाईन असे त्यांनी महाजन यांना सांगितले.
नक्की वाचा - UP News: रीलने केला घात! एकाच घरातील 6 मुली बुडाल्या, चौघींचा मृत्यू, गावावर शोककळा
यानंतर सदर महिला आणि तिच्या पतीला आपल्या चार्टर्ड विमानातून उपमुख्यमंत्री शिंदे मुंबईत घेऊन आले. प्रवासादरम्यान त्यांनी या महिलेशी बोलून त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच मुंबईत आल्यावर त्यांच्यासाठी विशेष रुग्णवाहिका उपलब्ध करून देत या महिलेला रुग्णालयातही दाखल केले. उपमुख्यमंत्री शिंदे हे कायमच गरजूंच्या मदतीला धावून जातात हे सर्वश्रुत आहे. मात्र विमान चुकलेल्या लाडक्या बहिणीच्या मदतीला धावून जात ते आजही 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन' आहेत हेच त्यांच्या या कृतीतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.