छत्रपती शिवाजी महाराजांवर काही दिवसांपूर्वी देण्यात आलेल्या वक्तव्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या चर्चेत आहेत. शिवाजी महाराजांनी सूरत लुटली नव्हती, असा दावा फडणवीसांनी केला होता. त्यावर विरोधकांनी त्यांच्यावर खोटा इतिहास सांगितल्याचा आरोप केला. शिवाजी महाराजांनी दोन वेळा सूरत लुटली असा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दावा होता. शिवाजी महाराजांनी आधी सूरतला नोटीस पाठवून खंडणी मागितली होती. त्यानंतर सूरत लुटण्याचा निर्णय घेतला, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना केला होता. या सर्व टीकेवर फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बाप्पांना सर्व माहिती
देवेंद्र फडणवीसांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पाचं आगमन झालं. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. 'महाराष्ट्राची प्रगती कोण करु शकतं हे बाप्पांना माहितीच आहे. ते बाप्पांनी पाहिलंय, तसंच बाप्पांना मानणाऱ्या सर्व महाराष्ट्रातील नागरिकांनी पाहिलं आहे. त्यामुळे बाप्पांचा आशीर्वाद मिळेल, असं मला वाटतं. बाप्पांना तसं काही मागावं लागत नाही, ते सगळं देतात,' असं फडणवीस यांनी सांगितलं.
बऱ्याच लोकांना सद्बुद्धी देण्याची आवश्यकता आहे. मी त्यांची नावं घेणार नाही, पण सर्वांना सद्बुद्धी मिळू अशी बाप्पांकडं प्रार्थना करतो, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावाला.
( नक्की वाचा : 'राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येऊ दे', खडसेंचं बाप्पाला साकडं )
वादावर स्पष्टीकरण
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना जयंत पाटील यांच्या वक्तव्यालाही उत्तर दिलं. 'ज्यांच्या सरकारलाच खंडणी सरकार म्हंटलं गेलं, त्यांना प्रत्येक ठिकाणी खंडणीच दिसेल. मला एका गोष्टीचं समाधान आहे की जे खऱ्या अर्थानं इतिहासाचे अभ्यासक शिवरत्न शेटे, सदानंद मोरे यांनी या सर्वांनी अतिशय स्पष्ट भूमिका मांडली आहे. माझं इतकंच म्हणणं आहे की, माझा राजा लुटारु नव्हता. माझ्या राजांना लुटारु म्हणनं मी खपवून घेणार नाही.
महाराजांना लुटारु म्हणनं योग्य नाही. त्यांनी कधीही लूट केलेली नाही. इतिहासातील चुकीच्या गोष्टी सुधारल्या पाहिजेत. हा इतिहास इंग्रजांनी लिहिलेला आहे. इंग्रजांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराजांना पाहण्याच्याऐवजी आपल्या इतिहासकारांनी सोबत यावं, जिथं कुठं महाराजांबद्दल चुकीचं असेल ते सुधारण्याचा प्रयत्न करावा, असं फडणवीस यावेळी म्हणाले.