Devendra Fadnavis on Pune Land Scam: पुण्यातील मुंढवामध्ये झालेल्या जमीन घोटाळ्याची गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चा आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावरही आरोप झाले. पण, या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या FIR मध्ये त्यांचं नाव नाही. त्यामुळे पोलिसांवर मोठी टीका झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'NDTV मराठी' ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. 'NDTV मराठी'मंचच्या 'अनस्टॉपेबल महाराष्ट्र' कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
काय म्हणाले मुख्यमंत्री ?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावरील प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की, पुण्यातील जमिनीच्या प्रकरणात सरकारनं लोकांची मागणी येण्यापूर्वी मी आदेश दिले. FIR दाखल केला. FIR मध्ये तो दोषी आहे असं नाही तसंच FIR मध्ये नाव नाही म्हणून तो दोषी नाही असं होत नाही.
आता या प्रकरणाची चौकशी होईल त्यावेळी अजून कोण दोषी आहे निश्चित होतं. त्यानुसार दोषारोप पत्र तयार होतं.त्यावर दोषी व्यक्ती निश्चित होतं. FIR हा दोषी ठरवत नाही.आम्ही यात कुणालाही वाचवणार नाहीत. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल.
( नक्की वाचा : Devendra Fadnavis Exclusive : एकनाथ शिंदे सतत दिल्लीला का जातात? CM नी सांगितलं कारण, 2029 बाबत मोठी घोषणा )
या विषयावर सातत्यानं आवाज मांडणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. कुणीही या प्रकरणात योग्य पुरावा दिला तर तो ग्राह्य धरला जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. हे सरकार कोणत्याही दोषीला वाचवणार नाही, असं ते म्हणाले.
सरकारमध्ये कुणी चुकीचं करत असेल तर ते 100 टक्के थांबवण्याची माझी ताकद आहे. सुदैवानं नंबर गेमही आता आम्हाला अनुकूल आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.