मनोज सातवी, पालघर:
‘Dhavallakshmi turtle Special Story: आतापर्यंत आपण ससा आणि कासवाची गोष्ट ऐकली आहे. पण आता आम्ही तुम्हाला 'एका कासवाची वेगळी' गोष्ट सांगणार आहोत. डहाणूच्या समुद्रात जखमी अवस्थेत सापडलेल्या आणि उपचारानंतर मुक्त करण्यात आलेल्या ‘धवललक्ष्मी' या ऑलिव्ह रिडले मादी कासवाने तब्बल चार हजार किलोमीटरहून अधिक समुद्रप्रवास करत संशोधकांचे लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे सॅटेलाइट टॅगिंग करून समुद्रात सोडण्यात आलेले ‘धवललक्ष्मी' देशातील पहिले मादी ऑलिव्ह रिडले कासव ठरले आहे. सॅटेलाइट ट्रॅकिंगमुळे तिच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जात असून, सागरी जैवविविधता आणि स्थलांतर अभ्यासासाठी हा प्रवास अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
Pune News: मोठी बातमी! शरद पवार गटाच्या नेत्यावर शाईफेक; कीर्तनकार भंडारेंसह साथीदारांकडून हल्ला
"एका कासवाची वेगळी गोष्ट"
डहाणूच्या समुद्रकिनाऱ्यावर जखमी अवस्थेत सापडलेल्या ‘धवललक्ष्मी' या ऑलिव्ह रिडले मादी कासवाने आज संपूर्ण सागरी संशोधनविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. १० ऑगस्ट २०२५ रोजी किनाऱ्यावर आढळलेल्या या कासवावर डहाणूच्या सागरी कासव संक्रमण उपचार केंद्रात उपचार करण्यात आले. उपचारानंतर २० नोव्हेंबर २०२५ रोजी तिच्या पाठीवर सॅटेलाइट टॅग बसवून तिला पुन्हा समुद्रात मुक्त करण्यात आले. विशेष म्हणजे, सॅटेलाइट टॅगिंग करून समुद्रात सोडण्यात आलेले हे देशातील पहिले मादी ऑलिव्ह रिडले कासव ठरले आहे.
समुद्रात मुक्त झाल्यानंतर धवललक्ष्मीने जणू अथांग निळाईलाच आपले घर मानत हजारो किलोमीटरचा प्रवास सुरू केला. डहाणूहून गुजरातच्या समुद्री भागात पोहोचल्यानंतर तिने खोल समुद्रातून पश्चिमेकडे कूच करत तब्बल अठराशे किलोमीटरचा प्रवास केला आणि ओमानच्या किनाऱ्याजवळ पोहोचली. या प्रवासादरम्यान ती ३८० मीटर खोल समुद्रात गेल्याची माहिती सॅटेलाइट डेटामधून समोर आली आहे. काही काळ ती ऑलिव्ह रिडले कासवांच्या प्रजनन क्षेत्राजवळ थांबल्याने संशोधकांमध्ये उत्सुकता वाढली होती. त्यानंतर तिने पुन्हा भारताच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला असून सध्या ती रत्नागिरी किनारपट्टीच्या दिशेने वेगाने सरकत आहे. आतापर्यंत तिने साडेतीन हजार किलोमीटर पेक्षा जास्त अंतराचा प्रवास केला आहे.
धवललक्ष्मीने आतापर्यंत चार हजार किलोमीटरहून अधिक समुद्रप्रवास केल्याचे मानले जात असून, तिच्या प्रत्येक हालचालीवर संशोधक सॅटेलाइटद्वारे लक्ष ठेवून आहेत. तज्ज्ञांच्या मते, या प्रवासातून सागरी जैवविविधता, कासवांचे स्थलांतर मार्ग, खाद्यसाखळी आणि प्रजनन प्रक्रियेबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे. उपवनसंरक्षक दिवाकर निरंजन यांनी सांगितले की, धवललक्ष्मीचा हा प्रवास भविष्यात सागरी पर्यावरण संवर्धनासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. डहाणूच्या किनाऱ्यावरून सुरू झालेली ही समुद्रयात्रा आता निसर्गातील अनेक गूढ रहस्यांचा उलगडा करणारी ठरत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world