डोंबिवली: इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाला राज्यभरातून जोरदार विरोध आहे. एकीकडे राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात विरोधकांनी आवाज उठवला असताना नागरिकांनीही याचा निषेध केला आहे. महत्त्वाचं म्हणजे या हिंदीसक्तीच्या निर्णयाचा आता शिक्षण क्षेत्रातूनही कडाडून विरोध केला जात आहे. यामध्ये डोंबिवलीतील विद्यानिकेतन शाळेने पुढाकार घेतला असून शाळेच्या बसवरील ‘माय मरो… मौसी जगो!' बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, डोंबिवलीत विद्यानिकेतन शाळेच्या बसवर लावलेला “माय मरो… मौसी जगो!” बॅनर सध्या सोशल मीडियावर आणि शहरभर चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. मराठी भाषेवरील वाढता अन्याय, मुंबईतील मराठी लोकसंख्येचा घटता टक्का, आणि शिक्षण संस्थांमधील हिंदी सक्ती यावर या बॅनरद्वारे थेट आणि परखड भाष्य करण्यात आलं आहे.
विशेष म्हणजे, हा विरोध कुणा राजकीय पक्षाकडून नव्हे, तर थेट शाळा प्रशासन, शिक्षक आणि पालकांच्या वतीने झाल्याचं चित्र समोर येतं आहे यात २० पेक्षा कमी मराठी विद्यार्थ्यांसाठी हिंदी सक्ती केली जाते ,अनेक शाळा सातवी-आठवी नंतर मराठी विषय थांबवतात शिक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
(नक्की वाचा- Dombivli : डोंबिवलीच्या हायप्रोफाईल सोसायटीमध्ये सापडले 2 कोटींचे ड्रग्ज! घर पाहून पोलीसही हादरले)
एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन मराठी अस्मिता आणि हिंदी सक्तीविरोधात मोर्चा काढण्याच्या पार्श्वभूमीवर हा बॅनर खालीपासून उठणाऱ्या आवाजाचं प्रतीक ठरत आहे. या बॅनरमुळे मराठी भाषिक समाजातील असंतोष आणि अस्मितेची भावना पुन्हा एकदा उफाळून आली आहे, आणि शिक्षण क्षेत्रात हिंदी सक्तीवर मोठी चर्चा सुरू झाली आहे.