विशाल पुजारी, प्रतिनिधी
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापुरात सर्किट बेंच (Kolhapur Circuit Bench) मागणीला अखेर 40 वर्षानंतर यश आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी सर्किट बेंच मंजुरीची अधिसूचना जारी केली आहे. या अधिसुचनेनुसार 18 ऑगस्टपासून कोल्हापुरात न्यायालयाच्या जुन्या इमारतीत सर्किट बेंचचे कामकाज सुरू होणार आहे.
सध्या हे सर्किट बेंच कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या सहा जिल्ह्यांचं मिळून कोल्हापुरात सुरू करण्यात येत आहे. कोल्हापूर हे मुख्य केंद्र असेल अशी माहिती आहे. दरम्यान सर्किट बेंच सुरू होण्यापूर्वीच कोल्हापुरात विविध प्रकरच्या अफवा पसरवल्या जात आहेत. सर्किट बेंचमुळे कोल्हापुरातील जागा, घरांचे भाडे, हॉटेल यांची भाडं दुप्पट होणार असल्याचे मेसेज व्हायरल होत आहे. व्हायरल मेसेजमुळे इतर पाच जिल्ह्यात कोल्हापूरची प्रतिमा बदलत असल्याचा भीती व्यक्त केली जात आहे. सहा जिल्ह्यांचं मिळून कोल्हापुरात सर्किट बेंच सुरू केलं तर येथे मोठी गर्दी होऊ शकते. याशिवाय हॉटेलचे भाडं, घराच्या किमती यातही मोठी वाढ होऊ शकते. कोल्हापुरात अनेक कार्यालयं सुरू होऊ शकतात. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांकडून घराच्या आणि जागेच्या किमतीत मोठी वाढ केली जात असल्याचे मेसेज व्हायरल होत आहेत. मात्र हा संदेश फेक असल्याचं कोल्हापुरातील माजी न्यायमूर्तींनी सांगितली.
नक्की वाचा - Solapur News: इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा अजब कारनामा!, बापाचा व्यवसाय वाढवायला गेला अन् वाईट फसला
हॉटेल-वाहतुकीचे भाडं वाढणार?
माजी न्यायमूर्ती अॅड. तानाजी नलवडे यांनी व्हायरल मेसेजवर खंत व्यक्त केली आहे. दरवाढ होऊ नये यासाठी प्रयत्न करणार असा निर्धार त्यांनी केला आहे. सर्किट बेंचमुळे कोल्हापूर शहरातील जागा, घरांचे भाडे, हॉटेल यांची दुप्पट भाडेवाढ होणार असल्याचे मेसेज सर्वत्र व्हायरल होत आहेत. यामुळे इतर पाचही जिल्ह्यांतील नागरिकांमध्ये कोल्हापूरची प्रतिमा वेगळी बनताना दिसून येतेय. ही सगळी परिस्थिती पाहता कोल्हापूरची प्रतिमा जपण्यासाठी येणाऱ्या काळात रिअल इस्टेटसह, वाहतूक, हॉटेल व्यवसायामध्ये कृत्रिम भाडेवाढ करणार नाही, असा निर्धार माजी न्यायमूर्ती अॅड. तानाजी नलवडे, क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष यांनी केला आहे.
सर्किट बेंच म्हणजे काय?
हायकोर्टाची सर्किट बेंच (Circuit Bench) म्हणजे उच्च न्यायालयाचा एक तात्पुरता किंवा अस्थायी विभाग. हे खंडपीठ मुख्य न्यायालयाच्या क्षेत्राबाहेरील दूरच्या भागांमध्ये किंवा ठिकाणी खटले ऐकण्यासाठी स्थापन केले जाते. सर्किट बेंच विशिष्ट कालावधीसाठी, सहसा वर्षातून काही दिवस किंवा महिने काम करते. त्यामुळे हे नियमितपणे चालणाऱ्या कायमस्वरूपी खंडपीठासारखे नसते.
सर्किट बेंच का स्थापन करतात?
सर्किट बेंच सुरु करण्याचं मुख्य उद्दिष्ट दूरच्या किंवा दुर्गम भागातील लोकांना न्याय मिळवून देणे आणि मुख्य न्यायालयात जमा झालेल्या प्रकरणांचा निपटारा करणे हे असते. सर्किट बेंचमुळे याचिकाकर्ते आणि वकिलांना मोठ्या शहरांमधील मुख्य न्यायालयात जाण्याचा प्रवास खर्च आणि त्रास वाचतो.