अभय भुटे, प्रतिनिधी
T-27 Tigress Latest Update : साकोली तालुक्यासह नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावांमध्ये गेल्या चार महिन्यांपासून ‘टी-२७' या नरभक्षक वाघिणीने दहशत माजवली होती. परिसरात भीतीचं सावट निर्माण करणाऱ्या या लंगड्या वाघिणीला अखेर उमरझरी परिसरात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे. तीन महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या या आव्हानात्मक मोहिमेचा अखेर यशस्वी शेवट झाला असून परिसरातील नागरिकांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे.या वाघिणेनी दोन बळी घेतले असून चार जीवघेणे हल्ले केले होते. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प,गोंदिया व भंडारा वनविभागाच्या रॅपिड रिस्पॉन्स टीम (RRT) तसेच एफडीसीएमच्या वनकर्मचाऱ्यांनी संयुक्तरीत्या हे धाडसी ऑपरेशन पार पाडले.
चार महिन्यांपासून सुरू होती शोध मोहीम
या वाघिणीने चार हल्ले करत दोघांचा बळी घेतला होता. त्यामुळे नागरिकांचा नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. वन विभाग वाघिणीला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. मात्र अनेक वेळा वनविभागाच्या हाती लागूनही चकवा देणाऱ्या या वाघिणीला पकडण्यासाठी शेकडो वनकर्मचारी,तज्ज्ञ आणि अधिकारी दिवस-रात्र प्रयत्नशील होते.दरम्यान, या मोहिमेला आता यश आले असून नागरिकांची भीतीही दूर झाली आहे.
नक्की वाचा >> Washim News: वाशिममध्ये पावसाचा कहर! कांचन नदीच्या पुरात मुख्य रस्ता अर्ध्या किमीपर्यंत खचला, वाहतूक ठप्प
उसाच्या शेतातून वाघिणीला केले जेरबंद
या वाघिणीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले होते.त्यामुळे वनविभाग या वाघिणीच्या शोधात होते. आज ऊसाच्या शेतात वाघिणीने शेळीची शिकार केल्याची माहिती वन विभागाला मिळताच युद्ध पातळीवर काम करत त्या वाघिणीला जेरबंद करण्यात आले आहे.
नक्की वाचा >> Kalyan News: टिटवाळ्यात भरधाव कारने तीन चिमुकल्यांना उडवलं, पाणीटंचाई ठरली अपघाताचं कारण, नेमकं काय घडलं?