Former MLA Subodh Saoji Letter to PM Narendra Modi: देशातील पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्यानंतर देशावर मोठे आर्थिक संकट ओढवले असून, अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी देशातील सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधींचे मानधन एका वर्षासाठी गोठवण्यात यावे, अशी खळबळजनक आणि महत्त्वपूर्ण मागणी महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते व माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून देशाच्या हितासाठी कठोर निर्णय घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
आजी माजी लोकप्रतिनिधींचे मानधन थांबवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात सुबोध सावजी यांनी देशाच्या ढासळत्या आर्थिक स्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. "पाच राज्यांच्या निवडणुकांचा खर्च आणि त्यानंतरची परिस्थिती यामुळे देशावर बिकट आर्थिक संकट आले आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी आणि भारत सरकारच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे," असे सावजी यांनी पत्रात म्हटले आहे.
मी महाराष्ट्रातून एक माजी लोकप्रतिनिधी म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. देशावर संकट असताना केवळ इतरांना सल्ला न देता, मी स्वतःपासून सुरुवात करण्यास तयार आहे. पंतप्रधान आणि राष्ट्रपतींसह देशातील आजी-माजी लोकप्रतिनिधींचे मानधन गोठवताना, त्यासोबत माझेही मानधन एका वर्षाकरिता गोठविण्यात यावे, ही माझी प्रांजळ इच्छा आहे," अशी ठाम भूमिका सुबोध सावजी यांनी घेतली आहे.