मनिष रक्षमवार, गडचिरोली: घरातील लग्नसोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. लग्नसोहळ्यानंतर नव दांपत्य सुखी संसाराची, भविष्याची स्वप्ने रंगवत होती मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. लग्नाला अवघे दोन दिवस उलटले असतानाच नवरदेवाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची मन सुन्न करणारी घटना गडचिरोली जिल्ह्यामध्ये घडली आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, लग्नाच्या दोन दिवसानंतर अचानक प्रकृती बिघडल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने नवरदेवाचा मृत्यू झाल्याची काळीज पिळवटू टाकणारी घटना गडचिरोली जिल्ह्यात घडली. नारायण कंवलसिंह बोगा (वय, 26) असे मृत तरुणाचे नाव असून नंदुरबारच्या कोरची तालुक्यातील गहाणेगाटा मध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे.
नवरदेव कुंवलसिंह बोगायाच्या वडिलांचा झाला होता. पितृछत्र हरवल्यानंतर आईला खूप काम करावे लागतात म्हणून त्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न ठरलं, मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा अन् स्वागत समारंभही झाला. एकीकडे नवदांपत्य सुखी संसाराची स्वप्ने रंगवत असतानाच नियतीने घात केला. लग्नाच्या दोन दिवसानंतर नारायण कंवलसिंह बोगा याची प्रकृती अचानक बिघडली.
नारायणची प्रकृती बिघडल्यानंतर सर्वांची एकच धावपळ उडाली. त्याला रुग्णालयात नेण्याआधीच त्याने नववधूच्या मांडीवर डोके ठेवत जीव सोडला. नारायण बोगा याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या भयंकर घटनेने लग्नघरात एकच शोककळा पसरली. घरातील कर्ता पुरुष गमावल्याने आणि लग्नानंतर दोन दिवसातच मृत्यूने गाठल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, अलिकडे हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे प्रमाण वाढले आहे. अगदी चालता बोलता, जेवणाच्या ताटावर, जीममध्ये अनेकांना मृत्यूने गाठल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टर करत आहेत.