संपूर्ण राज्य दुष्काळाने होरपळतंय, निवडणुका संपल्याने सरकारने आता त्याकडे लक्ष द्यावे : नाना पटोले

राज्याला मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागत असून राज्य सरकारने उपाययोजना करण्यासाठी पावलं उचलावीत, असं नाना पटोले यांनी म्हटलं.  

Advertisement
Read Time: 2 mins

लोकसभा निवडणुकीचे राज्यातील पाचही टप्पे पूर्ण झाले आहे. आता प्रतीक्षा 4 जून रोजी लागणाऱ्या निकालाची आहे. मात्र आता निवडणुका संपल्या असल्याने राज्य सरकारने दुष्काळाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. संपूर्ण राज्य दुष्काळाने होरपळत आहे. बहुतांश भाग भीषण पाणी टंचाईचा सामना करत आहे. आता राज्य सरकारने दुष्काळाकडे गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी पटोले यांनी केली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राज्यात अनेक धरणांतील पाणीसाठा जेमतेम असून हजारो गावांना, वाड्या वस्त्यांना पिण्याचे पाणी मिळत नाही. पाणी टंचाई असलेल्या प्रत्येक गावखेड्यात पिण्याचे पाणी मिळावे तसेच जनावरांना चारा उपलब्ध झाला पाहिजे. यासाठी आचारसंहिता शिथिल करुन तातडीने पिण्याचे पाणी व जनावरांना चारा मिळेल यासाठी सरकारने निर्णय घ्यावेत, अशी नाना पटोले यांनी केली आहे.

(नक्की वाचा - VIDEO : पोलिसांना शिवीगाळ करणे भोवलं; भाजप खासदार कपिल पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल)

राज्याच्या ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी नागरिरांना भर उन्हात वणवण करावी लागत आहे. चारा उपलब्ध नसल्याने  जनावरांचे देखील हाल होत आहेत. अनेक शहरात 10-12 दिवसातून एकदा पाणी येते. राज्यातील 23 जिल्ह्यात पाण्याची भीषण टंचाई असल्याची माहिती आहे. मराठवाड्यातील परिस्थिती तर अत्यंत गंभीर आहे. चारा नसल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. राज्याला मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागत असून राज्य सरकारने उपाययोजना करण्यासाठी पावलं उचलावीत, असं नाना पटोले यांनी म्हटलं.  

नाना पटोले यांनी पुढे म्हटलं की, आम्ही चार महिन्यापूर्वी सांगितले होते पण राज्यातील भाजपा-शिंदे-अजित पवार यांचे सरकार आपसातील कुरघोड्या व दुसरे पक्ष फोडणे यातच व्यस्त असल्याने त्यांनी लक्ष दिले नाही. लोकसभा निवडणुकीमुळे शासन व प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त राहिले. आता राज्यातील निवडणूक कार्यक्रम संपला आहे. राज्य सरकारने तातडीने पाणी व चाऱ्याची सोय करण्याकडे लक्ष दिले पाहिजे. 

Advertisement

(नक्की वाचा-  देश हादरवणाऱ्या 6 अपघात प्रकरणांतील आरोपींचे काय झाले?)

चारा छावण्या सुरु केल्या पाहिजेत

राज्यात 45 दिवस पुरेल एवढा चारा उपलब्ध असल्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सांगत आहेत. चारा उपलब्ध असेल तर मग चारा छावण्या सुरु करण्यासाठी महाभ्रष्टयुती सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पहात आहे? राज्यात तातडीने चारा छावण्या सुरु केल्या पाहिजेत. अवकाळी पावसाच्या तडाख्याने आधीच शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात आता दुष्काळाचे संकट ओढवले आहे. शेतकरी चारी बाजूनी संकटाने घेरला आहे, त्याला आधार देण्याची गरज आहे सरकारने तातडीने उपयायोजना कराव्यात, असेही नाना पटोले म्हणाले.