देवा राखुंडे
पुण्याच्या दौंड मध्ये गेल्या दोन दिवसांत पावसाने हाहाकार उडवून दिला होता. त्यानंतर आता एका पोल्ट्री फार्मची भिंत ढासळून तब्बल 18 हजार कोंबड्यांचा जागीच दगावल्या आहेत.यात कुक्कुटपालक शेतकऱ्याचं तब्बल 80 लाख रुपयांच नुकसान झाल्याचा दावा या शेतकऱ्याने केला आहे. दौंड तालुक्यातील हातवळण गावात ही दुर्घटना घडली आहे. राज्यात मान्सूनचं आगमन वेळे आधीच झालं आहे. पहिल्याच पाऊस राज्यभरात जोरदार झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी तारांबळ उडाली होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दौंड तालुक्यातील हातवळण गावातील शुभम गोगावले यांचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे. यांच्या शेडमध्ये जवळपास 22 ते 23 हजार कोंबड्या होत्या. याच पोल्ट्रीची भिंत पावसामुळे ढासळली. यापैकी जवळपास 18 हजार कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज लावला जातोय. आतापर्यंत या शेड मधून 9 ते 10 हजार मृत कोंबड्या बाहेर काढण्यात आल्या आहेत. तर आणखीही मृत कोंबड्या बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. जोराने सुटलेल्या वादळाने या पोल्ट्री फार्मच्या शेड वरील पत्रे उडाले. भिंत देखील कोसळली. त्यामुळेच हा दुर्दैवी प्रकार घडला गेलाय.
राज्यात मॉन्सूनने पुन्हा जोर धरला आहे. पुणे जिल्ह्याच्या इंदापूर बारामती यासोबतच दौंड तालुक्यात देखील या पावसामुळे शेतकऱ्यांसह व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे आता शासनाकडून पंचनामे देखील केले जात आहेत. या पावसानं आणि वादळांना दौंड तालुक्यातील हातवळण येथील कुक्कुटपालक व्यावसायिक शुभम गोगावले यांचही नुकसान झालं आहे. अचानक आलेल्या या सुसाट वादळाने गोगावले यांच्या पोल्ट्री फार्मवरील पात्राचे शेड उडाले गेले. भिंतही ढासळली. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसात दौंड परिसराला पावसाने चांगलेच झोडपले आहे.