कल्याण: कल्याण -शीळ रस्त्यावर पलावा पूलाच्या बाजूला असलेले महालक्ष्मी हॉटेल केडीएमसीने अनधिकृत असल्याचे घोषित केले होते. या संदर्भात मनसे नेते राजू पाटील यांनी दाखल केलेली जनहित याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. ही याचिका का फेटाळली गेली आहे? अजून याचा तपशील येणे बाकी आहे. तपशील आल्यानंतर आम्ही योग्य ती पुढची कारवाई करु असे मनसेचे पदाधिकारी हर्षद पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, कल्याण शीळ रस्त्यावरील पलावा जंक्शन येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पलावा पूलाचे काम प्रस्तावित करण्यात आले. एमएसआरडीसी कडून हे काम मंजूर केले गेले. या पूलाच्या कामासाठी कंत्राटदार नेमला गेला. हा पूल दोन मार्गिकेचा आहे. या पूलाच्या कामाच्या दर्जाबाबत आणि दिरंगाई बाबत मनसे नेते राजू पाटील यांनी अनेकदा प्रशासनाकडे प्रश्न उपस्थित केला होता. तसेच सत्ताधारी पक्षाला टिकेचे लक्ष्य केले होते.
या पूलाचे काम मार्गी लागत नसल्याने वाहतूक कोंडीत भर पडत होती. अखेरीस शीळहून कल्याणच्या दिशेने जाणारी पूलाची एक मार्गिका खुली करण्यात आली. तिचे लोकार्पण करण्यात आले. त्यावरुनही सत्ताधारी पक्ष टिकेचा लक्ष्य झाला. घाई गडबडीत पूलाची ही मार्गिका खुली केल्याने आजही हा पूल चर्चेचा विषय ठरला आहे. ही एक मार्गिका खुली करुन वाहतूक काेंडी दूर होणार नाही. त्यासाठी कल्याणहून शीळच्या दिशेने जाणारी पूलाची मार्गिकेचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.
याकडे मनसेने नेते राजू पाटील यांनी लक्ष वेधले. या दुसऱ्या मार्गिकेच्या कामात आड येणारे महालक्ष्मी कृपा होटल वर कारवाई केली जात नाही. त्यासाठी अलायमेंट बदलण्यात आल्याचा आरोपही मनसे नेते पाटील यांनी केला होता. या हॉटेलला महापालिकेने बेकायदा ठरविले होते. तरी देखील त्या विराेधात कारवाई केली जात नाही. अखेरी मनसे नेते राजू पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन कारवाईची मागणी केली होती. न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे.
यासंदर्भात हॉटेल मालक दीपा पाटील यांनी सांगितले की, मनसे माजी आमदार राजू पाटील यांनी याचिका दाखल केलेली होती. जे महालक्ष्मी आहे. त्यामुळे विकास कामाला अडथळा येतात. या वास्तूला ३५ वर्षे आहे. त्या रस्त्यासाठी आमची जमीन गेली. आम्ही विकास कामाला अडथला आणला नाही. हे लोक सांगतात हॉटेल अनधिकृत आहेत. आम्हाला त्रास देतात.
२०२२ लाही केस केली होती ती केस फेटाळली आहे. आजही ती केस फेटाळली आहे. लालचंद पाटील यांनी सांगितले की, राजू पाटील यांनी याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेच्या विरोधात निकाल आला आहे. निकाल आमच्या बाजूने लागला आहे. कल्याण शीळ रस्त्याला आम्ही १९ गुंठे जागा दिलेली आहे. तरी पण स्वत:च्या स्वार्थासाठी हॉटेलवर लक्ष ठेवून हे बेकायदेशीर हॉटेल असल्याचे याचिकेत म्हटले होते. हाय कोर्टाचा निकाल आमचा बाजूने लागला आहे.
मनसेचे पदाधिकारी हर्षद पाटील यांनी सांगितले की, २०२० साली केडीएमसीने बेकायदा बांधकाम आणि लक्ष्मी हॉटेल अनधिकृत आहे. त्या पूर्वी देखील मनसे माजी आमदार राजू पाटील हे केडीएमसी सोबत पत्र व्यवहार करीत होते. त्या विरोधात कारवाई करावी. ज्यांची जागा या रस्त्यात गेलेली आहे. त्यांना योग्य तो मोबदला देऊन कारवाई करण्यात यावी. केडीएमसीकडून कारवाई करण्यात येत नव्हती. त्यासंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. केडीएमसी कारवाई करावी असे आदेश न्यायालयाने केडीएमसीला द्यावेत अशी आमची मागणी होती. हायकाेर्टाने याचिका फेटाळली याची ऑर्डर आम्हाला मिळालेली नाही. ऑर्डर मिळताच योग्य ती पुढील कारवाई करु.