मंगेश जोशी, जळगाव
गुजरातमधील विवाह सोहळा आटोपून अकोल्याच्या दिशेने निघालेल्या वऱ्हाडी मंडळींवर काळाने घाला घातला आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील वराड खुर्द जवळ महामार्गावर क्रुझर गाडीचा भीषण अपघात झाला. यामध्ये नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघात नेमका कसा घडला?
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातवरून लग्नाचं वऱ्हाड घेऊन ही क्रुझर अकोल्याच्या दिशेने जात होती. वराड खुर्द गावाजवळ पोहोचताच अचानक क्रुझरचा पुढचा टायर फुटला. टायर फुटल्याने गाडीचा ताबा सुटला आणि ती थेट रस्त्यालगत उभ्या असलेल्या गॅस टँकरवर जाऊन धडकली. धडक इतकी भीषण होती की यात गाडीतील तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.
(नक्की वाचा- Thane News: ठाणेकरांची चिंता वाढली! 3 दिवसांत 6 मुले गायब, नेमकं काय घडतंय?)
मृतांची ओळख आणि जखमींची स्थिती
या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये नववधू पूजा रवी वाघळकर, दत्तू भागवत आणि जगदीश वाघळकर यांचा समावेश आहे. तर अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी एका लहान बालकाची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
(नक्की वाचा- Chandrapur News: चंद्रपूर हादरलं! मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर रुग्णांसोबत भयंकर घडलं; रुग्णालय सील)
लग्नाचा आनंद घेऊन परतत असताना हे संकट ओढवल्याने वाघळकर आणि भागवत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विवाह समारंभाच्या काही तासांतच नववधूचा मृत्यू झाल्याने दोन्ही कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.