Jalgaon News: भुसावळ हादरले! माथेफिरूने 2 शाळकरी मुलींना विहिरीत ढकलले, दोघींचाही मृत्यू

Jalgaon News: दोन्ही मुली सकाळी 8 वाजेच्या सुमारास रस्त्याने जात असताना संशयित आरोपी रोहन चौधरी याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. काही कळण्याच्या आत त्याने दोन्ही मुलींना शेतातील खोल विहिरीत ढकलले आणि तिथून पळ काढला. 

जाहिरात
Read Time: 2 mins

मंगेश जोशी, जळगाव

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इयत्ता 9 वी मध्ये शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना विहिरीत ढकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आली आहे. दोन्ही मुली नेहमीप्रमाणे सकाळी शिकवणीसाठी घरून निघाल्या होत्या. मात्र, गावालगतच्या शेतात दबा धरून बसलेल्या एका माथेफिरूने या दोन्ही मुलींना अचानक विहिरीत ढकलून दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मुली सकाळी 8 वाजेच्या सुमारास रस्त्याने जात असताना संशयित आरोपी रोहन चौधरी याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. काही कळण्याच्या आत त्याने दोन्ही मुलींना शेतातील खोल विहिरीत ढकलले आणि तिथून पळ काढला. 

(नक्की वाचा-  Bank Strike: बँकांचा आज देशव्यापी संप, कोण-कोणत्या बँका होणार सहभागी? काय आहेत मागण्या?)

ग्रामस्थ मदतीसाठी धावले

मुलींच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेतात काम करणाऱ्या आणि जवळून जाणाऱ्या ग्रामस्थांनी तातडीने विहिरीकडे धाव घेतली. घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरताच शेकडो ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. ग्रामस्थानी मुलींना बाहेर करण्यासाठी बचावकार्य सुरु केले. मात्र विहिरीत पाणी असल्याने मुलींचा जीव वाचू शकला नाही. दोन्ही मुलींचा बुडून मृत्यू झाला. 

या धक्कादायक घटनेमुळे साकरी गावात भीतीचे आणि संतापाचे वातावरण असून, पालकांमध्ये आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे.

(नक्की वाचा-  Mumbai Mayor Election 2026: मुंबई महापौरपदाची निवडणूक लांबणीवर! भाजपला कसा होणार फायदा?)

आरोपी पोलिसांच्या ताब्यात

घटनेची माहिती मिळताच भुसावळ पोलिसांनी तातडीने साकरी गावात धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी संशयित माथेफिरू रोहन चौधरी याला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार, रोहन हा माथेफिरू असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र त्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Advertisement
Topics mentioned in this article