लक्ष्मण सोळुंके, जालना: व्यापाऱ्याने शेतमाल खरेदी केला पण पैसे न देता धूम ठोकल्याचा धक्कादायक प्रकार जालन्याच्या भोकरदनमध्ये घडला आहे. या प्रकारानंतर भोकरदन पोलीस ठाण्यात महिला शेतकऱ्यांनी राडा घातला. यावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. पैसे घेऊन फरार झालेल्या व्यापाऱ्याला पोलीसांची साथ असल्याचा आरोप करत संतप्त महिला शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या दिल्याचे यावेळी पाहायला मिळाले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जालन्यातील जवखेडा ठोंबरे गावातील शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करून व्यापाऱ्याने पैसे न देताच धूम ठोकली आहे.याबाबत भोकरदन पोलिसांनी तक्रार देऊनही व्यापाऱ्यांवर कोणतीही कारवाई न केल्यानं महिला शेतकरी संतप्त झाल्या आहे. पवन बिलगे असं फरार झालेल्या व्यापाऱ्याचं नाव आहे.
संतप्त महिला शेतकऱ्यांनी भोकरदन पोलीस ठाणे गाठून ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.आंदोलक महिलांनी पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या विरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडलाय. यावेळी पोलीस आणि आंदोलक महिला यांच्यात धक्काबुक्की देखील झाली. फरार व्यापाऱ्यावर कारवाई करा अशी मागणी या महिला शेतकऱ्यांनी केली आहे. व्यापाऱ्याला पोलीस पाठीशी घालत असल्याचाही आरोप यावेळी आंदोलक महिलांनी केला.
( नक्की वाचा- Political News : सांगलीत ठाकरे गटाला धक्का, चंद्रहार पाटील शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर?)
दरम्यान, पवन बिलगे या व्यापाऱ्याकडे परिसरातील शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, मका, अशा शेतीमालांची विक्री केली होती. मात्र या व्यापाऱ्याने गेल्या दोन वर्षांपासून या शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत. तो आज देतो, उद्या देतो असे म्हणत पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप या महिलांनी केला आहे. आपला शेतीकामासाठी पैसे लागतात, आम्ही काय फाशी घ्यावी का? असा सवालही यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला.