Mumbai to Latur : मुंबई ते लातूर सुसाट! नवा महामार्ग कसा असेल? कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये असेल थांबा?  

Kalyan-Latur Janakalyan Expressway : मुंबई–लातूर दरम्यानचा प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Kalyan-Latur Janakalyan Expressway : मुंबई ते लातूर हा प्रवास अधिक जलद, सोयीस्कर आणि सुरक्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) कल्याण–लातूर जनकल्याण द्रुतगती महामार्ग उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा महामार्ग तयार झाल्यानंतर मुंबई–लातूर या ५५० किलोमीटर दरम्यान प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळणार आहे.

कसा असेल मार्ग?

हा महामार्ग ठाणे, पुणे, अहिल्यानगर, बीड, धाराशीव आणि लातूर अशा सहा जिल्ह्यांतून जाणार असल्याचं सांगितलं जात होते. या महामार्गामुळे या जिल्ह्यांतील अनेक तालुके थेट जोडले जाणार असून स्थानिक नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि उद्योगांना मोठा फायदा होणार आहे. विशेषतः मराठवाड्यातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होण्याची अपेक्षा आहे. आता मात्र हा महामार्ग नेमका कसा जाणार आहे याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार उल्हासनगर, मुरबाड, जुन्नर, अहिल्यानगर, आष्टी, पाटोदा, बीड, केज, कळंब, लातूर, औसा आणि निलंगा असा हा महामार्ग जाणार आहे. यानुसार हा महामार्ग ठाणे, पुणे, अहिल्यानगर, बीड, धाराशीव आणि लातूर या सहा जिल्ह्यांतून जाणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Advertisement

नक्की वाचा - Pune Traffic: भीमा-कोरेगाव शौर्य दिनासाठी प्रशासन सज्ज, बुधवारपासून वाहतुकीत मोठे बदल, चेक करा पर्यायी मार्ग


मुंबई ते लातूर, कमी वेळात पोहोचणार

एमएसआरडीसीच्या सुमारे ४,००० किलोमीटर लांबीच्या रस्ते प्रकल्पांमध्ये या महामार्गाचा समावेश असून तो एक महत्त्वाचा द्रुतगती मार्ग मानला जात आहे. सुरुवातीला हा महामार्ग कल्याण, माळशेज घाट, अहिल्यानगर, बीड, मांजरसुंबा, अंबेजोगाई मार्गे लातूरपर्यंत जाणार असल्याचे सांगितले जात होते. आता मात्र या महामार्गाचा मार्ग अधिक स्पष्ट झाला असून तो नियोजनबद्ध पद्धतीने सहा जिल्ह्यांतून जाणार आहे. पुढील टप्प्यात हा महामार्ग महाराष्ट्र–कर्नाटक सीमावर्ती भागापर्यंत वाढवण्याचाही विचार केला जात आहे. त्यामुळे आंतरराज्य वाहतूक अधिक सुलभ होणार आहे. हा द्रुतगती महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते लातूर प्रवास कमी वेळात पूर्ण होईल, इंधनाची बचत होईल आणि अपघातांचे प्रमाणही कमी होण्यास मदत होईल. एकूणच, हा प्रकल्प महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.