Kalyan Dombivli News: रस्त्यांवर बसणाऱ्या फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरुन कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे. कल्याण डाेंबिवलीत बाहेरचे फेरीवाले आहे.ते स्थानिक फेरीवाले नाहीत. केडीएमसीचे फेरीवाला धाेरण नाही. फेरीवाल्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो, अशी तक्रार करत फेरीवाल्यांकडून मोठ्या प्रमाणात हप्ते घेतले जात आहेत, असा घणाघाती आरोप शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी केला आहे. तसेच फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई झाली नाही तर शिवसेना मोठे आंदोलन उभारणार," असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख रवी पाटील यांना दिला आहे.
फेरीवाल्यांविरोधात शिवसेना आक्रमक
"महापालिकेने कोणतेही फेरीवाला धोरण निश्चित केलेले नाही. आज रस्त्यारस्त्यांवर फेरीवाले बसलेले पाहायला मिळतात. हे फेरीवाले कुठले आहेत? हे कल्याणकर आहेत का? डोंबिवलीकर आहेत का? हे कुठलेही नाहीत. हे बाहेरचे आहेत. याच्यामागे जे कोणी अधिकारी असतील, जे त्यांचे हप्ते वसुली करतात. स्वतः फेरीवाले बोलले की आमच्याकडून हप्ते वसूल केले जातात, अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे," अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी केली आहे.
"सर्वपक्षाचे नेते फेरीवाल्यांसाठी लढत असतात, आनंदाची बाब आहे. पण फेरीवाला कुठे बसला पाहिजे? त्याचे धोरण निश्चित झाले पाहिजे. गोरगरिबाला न्याय मिळाला पाहिजे, मात्र तो कल्याणचा असावा. आणि रस्त्यावर बसण्याची परवानगी कुठेच मिळू नये. या फेरीवाल्यांमुळे आत्तापर्यंत किती अपघात झालेत? किती वेळा वाहतूक कोंडी होते, त्यामुळे कुठल्याही रस्त्यावर फेरीवाल्यांनी बसता कामा नयेत, यामध्ये कोणाचे चांगभलं होते?" असा सवालही रवी पाटील यांनी व्यक्त केला.
मोठ्या प्रमाणात हप्ते वसुली
दरम्यान, "यामध्ये हप्त्याचे आकडे ऐकले तर आम्हाला चक्कर येईल. एकाएका भागामध्ये दीड- दोन लाख वसुली होते. ही महापालिकेच्या संगनमताने होते. माझ्याकडे अशी माहिती आहे की काही शिपायांचे दोन दोन तीन तीन फ्लॅट आहेत. फेरीवालेच सांगतात आम्हाला हप्ते द्यायला लागतात. आमची भूमिका हीच आहे की सर्व नगरसेवक चिडले आहेत. यापुढे रोडवर कोणताही फेरीवाला दिसला आणि तुम्ही कारवाई केली नाही तर शिवसेना आंदोलन उभारेल," असा इशाराही त्यांनी दिला आहे.