Kolhapur News : तुम्ही कधी ऐकलं आहे का, एका मंदिरात चंद्र स्वतःहून येऊन काही सेकंदांसाठी शिवलिंगावर प्रकाश पाडतो? हा काही जादूटोणा नाही, तर हजारो वर्षांपूर्वीच्या भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी आणि शिल्पकारांनी एकत्र येऊन केलेला एक अद्भुत चमत्कार आहे!
कोल्हापूर शहरापासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर, कृष्णा नदीच्या (Krishna River) काठी वसलेलं एक छोटंसं गाव म्हणजे खिद्रापूर. या गावात आहे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेलं ऐतिहासिक कोपेश्वर मंदिर (Kopeshwar Mandir). दिवाळीनंतर येणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या (Tripurari Pournima) रात्री हे मंदिर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतं.
फक्त 6 ते 12 सेकंदांचा तो 'मॅजिक मोमेंट'
त्रिपुरारी पौर्णिमेच्या मध्यरात्री मंदिरात एक अविश्वसनीय घटना घडते— ज्याला 'प्रकाश पर्व' म्हणतात.
कोपेश्वर मंदिराचा 'स्वर्गमंडप' (Swargmandap) हेच या चमत्काराचं केंद्र आहे. या मंडपाला तब्बल 48 खांब (48 Pillars) आहेत आणि मध्यभागी एक गोलाकार झरोका आहे. हजारो वर्षांपूर्वी हा झरोका होम-हवनचा धूर बाहेर काढण्यासाठी ठेवला होता. पण आज तो एका खगोलशास्त्रीय योगायोगाचं प्रतीक बनला आहे.
( नक्की वाचा : Pune News : डेक्कन-नारायण पेठ फक्त 108 मीटरवर! पुणे मेट्रोमुळे मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी सुटणार )
नेमकं काय होतं?
जेव्हा चंद्र बरोबर या स्वर्गमंडपाच्या गोलाकार भागावर येतो, तेव्हा चंद्राचा संपूर्ण प्रकाश त्या झरोक्यातून खाली जमिनीवर ठेवलेल्या 'चंद्रशिलेवर' (Moonstone) पडतो. दोन्हीचा आकार तंतोतंत जुळतो!
शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, गोलाकारांचा हा परिपूर्ण प्रकाशीय मिलाफ केवळ 6 ते 12 सेकंदांसाठीच टिकतो. या काही सेकंदांसाठी, विज्ञानाचे नियम आणि अध्यात्माची श्रद्धा हातात हात घालून निसर्गाच्या अद्भुत चमत्काराला अनुभवतात.
पर्यटक, शिल्पकार आणि खगोलशास्त्रज्ञांची गर्दी
हजारो वर्षांपासून चालत आलेला हा दीपोत्सव (Deepotsav) पाहण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा येथून शेकडो लोक येतात. हा केवळ धार्मिक सोहळा नाही, तर अभ्यासकांची पर्वणी आहे.देशभरातील आणि परदेशातील अनेक खगोलशास्त्रज्ञ या अचूकतेचा अनुभव घेण्यासाठी मध्यरात्री येथे एकत्र येतात.
चालुक्य आणि शिलाहार राजवटीत (11-12 व्या शतक) बांधलेलं हे मंदिर शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिराची रचना, सुंदर शिल्पे आणि नक्षीकाम यामुळे हे मंदिर नेहमीच शिल्पप्रेमींच्या भेटीचं ठिकाण राहिलं आहे.
त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री मंदिरात हजारो दिवे लावले जातात. भजन, कीर्तन आणि नृत्याचे कार्यक्रम होतात. त्यामुळे संपूर्ण परिसर दिव्यांच्या रोषणाईने आणि उत्साहाने न्हाऊन निघतो. तुम्ही या दिवशी कोल्हापूर भागात असाल, तर विज्ञान आणि अध्यात्माचा हा अद्भुत संगम अनुभवायला खिद्रापूरला नक्की भेट द्या!