Kolhapur Mahalaxmi Temple: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील ऐतिहासिक आणि वैज्ञानिक चमत्कार मानला जाणारा किरणोत्सव यंदा पूर्ण होऊ शकला नाही. गेल्या 25 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे की, सलग पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात सूर्यकिरणे एकदाही देवीच्या मूर्तीपर्यंत पोहोचली नाहीत. यामागे वाढते प्रदूषण आणि प्रतिकूल हवामान ही प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
काय आहे किरणोत्सव?
अंबाबाई मंदिराची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, वर्षातून दोनदा मावळत्या सूर्याची किरणे थेट महाद्वारातून प्रवेश करून देवीच्या मूर्तीवर पडतात.
- पहिले दोन दिवस - किरणे देवीच्या चरणांना स्पर्श करतात.
- तिसरा दिवस - किरणे देवीच्या कमरेपर्यंत पोहोचतात.
- चौथा आणि पाचवा दिवस - किरणे संपूर्ण मूर्तीला न्हाऊ घालतात.
(नक्की वाचा- Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या विमानाचा अपघात कसा झाला? धक्कादायक बाब आली समोर)
यंदा का झाला अडथळा?
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, किरणोत्सव अपयशी ठरण्यामागे काही महत्त्वाची तांत्रिक आणि पर्यावरणीय कारणे आहेत. किरणे गाभाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी महाद्वार रोडवर प्रकाशाची तीव्रता किमान 18,000 Lux असणे आवश्यक असते. मात्र, यावर्षी ही तीव्रता केवळ 6,000 ते 7,000 Lux पर्यंतच मर्यादित राहिली. 1 फेब्रुवारी रोजी ती 13,000 Lux पर्यंत गेली होती, तेव्हा किरणे केवळ चांदीच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचू शकली.
कोल्हापूरचा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 150 च्या वर गेल्याने हवेतील धुलीकण आणि धुरामुळे सूर्यकिरणांचा मार्ग अडवला गेला. यंदा थंडीचा प्रभाव आणि वातावरणातील आर्द्रता जास्त असल्याने किरणांची भेदक क्षमता कमी झाली. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
(नक्की वाचा- VIDEO: 'दादांची आठवण उडत उडत पायाजवळ', तरुणीला घटनास्थळी सापडला 'असा' कागद; 80 लाख लोकांनी पाहिला व्हिडिओ)
भक्तांचा हिरमोड
हा अपूर्व सोहळा डोळ्यांत साठवण्यासाठी कोल्हापूरसह राज्यभरातून हजारो भाविक मंदिरात दाखल झाले होते. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि वाढत्या प्रदूषणामुळे किरणोत्सव पूर्ण न झाल्याने भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळाले.प्रदूषणाची हीच पातळी कायम राहिली, तर भविष्यात अशा ऐतिहासिक वारशावर आणि वैज्ञानिक चमत्कारांवर मोठे संकट ओढवू शकते, असा इशाराही पर्यावरणप्रेमींनी दिला आहे.