विशाल पुजारी
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. यासाठी मतदारसंघ पुनर्रचना देखील सुरु करण्यात आली आहेत. पण याच पुनर्रचनेवरून काही गावांमध्ये गोंधळ सुरू झाल्याचं दिसून येत आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्याच मतदार संघातील एका गावात काही ग्रामस्थ या पुनर्रचनेला विरोध करताना पाहायला मिळत आहेत. म्हाकवे या गावातील उपसरपंचांनी पुनर्रचनेच्या विरोधात भूमिका घेत थेट कर्नाटकात जाणार असा इशारा दिला आहे. यावरूनच आता जिल्ह्यात मतदारसंघ पुनर्रचनेवरून गोंधळ पाहायला मिळत आहे.
प्रशासनाकडून सध्या जिल्ह्यात मतदारसंघ पुनर्रचना सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनेक गावांच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पुनर्रचना करण्यात येत आहे. यामुळे काही गावांनी या पुनर्रचनेला हरकती घेण्यास सुरुवात केली आहे. यापैकीच एक गाव कागल विधानसभा मतदारसंघातील आहे. म्हाकवे असं या गावाचं नाव आहे. या गावातील स्थानिक नेत्यांनी नव्या पुनर्रचने विरोधात भूमिका घेत आक्रमक पवित्रा घेण्यास सुरुवात केली आहे.
नक्की वाचा - Awhad vs Padalkar: विधानभवनात आव्हाड-पडळकरांचे कार्यकर्ते भिडले, जोरदार राडा
नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या बानगे मतदार संघाऐवजी म्हाकवे मतदारसंघ करावा अन्यथा आम्ही कर्नाटकात जाऊ असा इशारा या ग्रामस्थांनी दिला आहे. बानगे या गावाला मतदार संघ म्हणून घोषित करण्यात आलं. या सगळ्या मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये नेत्यांनी म्हाकवे हाच मतदारसंघ निर्माण करून या गावांमध्ये बानगे गाव समाविष्ट करावा अशी अपेक्षा व्यक्त केले होती. साडेपाच ते सहा हजार इतकी म्हाकवे या गावाची लोकसंख्या आहे. त्यामुळे गावातील नेत्यांनी पुनर्रचनेमध्ये म्हाकवे हा गट तयार करण्यात यावा अशी मागणी होत होती. मात्र या मागणीला डावलून सिद्धनेर्ली या गटामध्ये म्हाकवे समावेश केल्यामुळे ग्रामस्थांसह नेत्यांनी नाराजी दर्शवली आहे.
म्हाकवे गावचे उपसरपंच अजित माळी यांनी या विरोधात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. महाकवी या गटामध्ये बाणगे या गावाचा समावेश पुनर्रचना होणं गरजेचं होतं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ते म्हणाले की, या सर्व पुनर्रचनेमुळे आम्ही याला विरोध करत आहोत. म्हाकवे मतदारसंघ करावा अन्यथा आम्ही कर्नाटकात जाऊ, अशा तीव्र शब्दात माळी यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. त्यामुळे या गावाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात आहे. मंत्री मुश्रीफ यांच्या बालेकिल्ल्यात होत असलेल्या राजकीय घडामोडींमुळे नक्कीच त्याचे पडसाद आगामी काळात उमटण्याची शक्यता आहे.