Lalbaugcha Raja Visarjan 2025 Controversy : सर्वसाधारणपणे अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत लालबागच्या राजाचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन होतं. मात्र यंदा या विसर्जनाला न भूतो असा उशीर झाला. दहा दिवस लालबागच्या भव्य मंडपात उभा असलेला राजा चौपाटीवर 12 तास पाण्यात उभा होता. समुद्रकिनाऱ्यावर बसलेला राजा काही केल्या हलत नव्हता. शेवटी रात्री 9 वाजता राजाचं विसर्जन पार पडलं. मिरवणूक निघाल्याच्या 33 तासांनी राजाचं रात्री 9 वाजता विसर्जन झालं. या घटनेनंतर अनेक गोष्टींवरुन लालबाग राजा सार्वजनिक मंडळ वादात सापडलं आहे. (lalbaugcha raja sarvajanik ganeshotsav mandal)
लालबागच्या राजाच्या मंडपात सर्वसामान्य भक्तांना दिली जाणारी दुय्यम वागणूक, ग्रहणापूर्वी सूतक काळात केलेलं विसर्जन आणि कोळी बांधवाना डावलल्याचा परिणाम गिरगाव चौपाटीवर दिसल्याचं सांगितलं जात आहे. अनेकांकडून तर मंडळाच्या व्यवस्थापनावर आक्षेप घेतला जात आहे.
1 लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यावर चढवण्यास अडचणी
यंदा बाप्पाच्या विसर्जनासाठी आधीपेक्षा दुप्पट आकाराचा अत्याधुनिक तराफा दाखल करण्यात आला होता. हा तराफा खास गुजरातहून तयार करुन आणल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या तराफ्यावर बाप्पाची मूर्ती चढविण्यात अनेक अडचणी येत होत्या. सकाळी भरतीची वेळ असल्याने समुद्रात पाणी वाढत होतं. लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यावर चढविण्यात अनेक अडचणी येत होत्या. रतीच्या पाण्यामुळे लालबागचा राजाच्या मूर्तीचा पाट तरंगू लागला. त्याचा परिणाम असा झाला की लालबागच्या राजाला खोल समुद्रात नेणारा अत्याधुनिक तराफा आणि मूर्तीचा पाट यांची भरतीच्या पाण्याच्या हेलकाव्यांमुळे जुळणी होत नव्हती.
2 गुजरातहून मागवला खास तराफा (Lalbaug Raja Visarjan new Tarafa/ raft)
आतापर्यंत लालबागच्या राजासाठी एक छोटा तराफा होता. हा तराफा कोळी बांधवांच्या बोटीकडून ओढला जात होता. मात्र यंदा अत्यधुनिक तराफा आणण्यात आला. यंदा लालबाग राजाच्या विसर्जनासाठी गुजरातहून तराफा मागविण्यात आला आहे. हा मोटराइज्ड तराफा आहे. हा नवा तराफा ३६० अंशात फिरवता येऊ शकतो. विसर्जन करताना स्प्रिंकलर्समधून पाण्याचे फवारे उडवता येईल. मोटराज्ड तराफ्याचं आणखी वैशिष्ट्य म्हणजे या तराफ्याला दुसऱ्या बोटीची मदत लागत नाही, असं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात भरतीच्या वेळी हा तराफा फारसा उपयुक्त ठरू शकला नाही.
3 ग्रहणाच्या सूतककाळात राजाचं विसर्जन
यंदा अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी रविवारी, ७ सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण होतं. मात्र या चंद्रग्रहणाचं सूतक ९ तास आधी म्हणजेच १२.३० वाजल्यापासून सुरू झालं होतं. या काळात कोणतंही शुभकार्य केलं जात नाही. गणपतीचं विसर्जनही ग्रहण काळातही केलं जात नसल्याचं धार्मिक तज्ज्ञांकडून केली जात आहे. काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रहणकाळात गणपतीचं विसर्जन करणं निषिद्ध असतं. गणपतीचं विसर्जन चतुर्दशीला दिवशी होणं अपेक्षित असतं. गणपतीची मूर्ती जागेवरुन हलवलं हे उत्थान असतं, जोपर्यंत मूर्ती पाण्यात विसर्जित करीत नाही तोपर्यत ही धार्मिक प्रक्रिया पूर्ण झालेली नसते.
बाप्पा सर्व पाहतोय...
लालबाग राजा सार्वजनिक मंडळाकडून सर्वसामान्य भक्तांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याचे अनेक व्हिडिओ वारंवार समोर येत असतात. एकेठिकाणी व्हिआयपी दर्शन तर दुसरीकडे गणेशभक्तांना सुरक्षा रक्षकांकडून दिली वागणूक यावरुन नागरिकांकडून कायम संताप व्यक्त केला जातो. त्याचा परिणाम काल रविवारी गिरगाव चौपाटीवर दिसून आल्याचंही म्हटलं जात आहे.