विष्णू बुरगे, प्रतिनिधी
Latur News : लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीनं बळीराजाच्या बांधिलकीचं नवं उदाहरण सर्वांसमोर ठेवलं आहे. बाजार समितीने शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलींसाठी हॉस्टेल उभारलं आहे. मागील साडेतीन वर्षांपासून या हॉस्टेलचं काम सुरु होतं. 180 मुलींना याचा फायदा मिळणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लातूर हे शिक्षणाचे माहेरघर आहे. लातूरमध्ये शिक्षणासाठी राज्याच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी दाखल होतात. मात्र लातूर जिल्ह्यातल्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलींसाठी उच्च शिक्षण घेताना आर्थिक परस्थिती बेताची असल्याने शहराच्या ठिकाणी राहण्याची सोय उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांच्या मुलींना उच्च शिक्षण घेता यावे त्यांना राहण्यासाठी जिल्हा पातळीवर सुविधा उपलब्ध व्हावी याच उद्देशाने लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मुलींसाठी अल्पदरात वसतिगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला
या हॉस्टेलला 'राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब मुलींचे वसतिगृह' असे नाव देण्यात आलं आहे. उच्च शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलींना हे वसतिगृह सुरू झाल्यामुळे त्याचा फायदा होणार आहे.
( नक्की वाचा : Satara News : सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवरील बंदी हटवली, मात्र प्रशासनाचे कडक निर्देश )
राज्यातील पहिलंच उदाहरण
शेतकरी तसंच शेतमजुरांच्या जीवावरच लातूरची कृषी उत्पन्न बाजार समिती मोठी झाली. त्याचबरोबर अनेक वेळा याच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सोयाबीन आणि तूर खरेदी विक्रीमध्ये मोठं नाव झालं. त्याचं ऋण काही प्रमाणात फेडण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने आपल्याला मिळत असलेल्या फायद्यातून मुलींसाठी हे हॉस्टेल उभारले आहे. शेतकरी-शेतमजुरांच्या मुलींसाठी हॉस्टेल बांधणारी ही पहिलीच कृषी बाजार समिती आहे. त्यांचा हा आदर्श अन्य बाजार समितींसाठीही प्रेरणादायी ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.