Beautiful Waterfall: महाराष्ट्रातील 'या' पर्यटनस्थळावर होतेय प्रचंड गर्दी, दूधसागर धबधबे पर्यटकांना खुणावतायत

राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भंडारदरा परिसराने अक्षरशः हिरवागार साज चढवलाय.

जाहिरात
Read Time: 2 mins
Bhandardara Waterfall Location

सुनील दवंगे, प्रतिनिधी 

Bhandardara Waterfall :  राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भंडारदरा परिसराने अक्षरशः हिरवागार साज चढवलाय.गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने दमदार पुनरागमन केल्याने शेंडी,रतनवाडी,घाटघर, हरिश्चंद्रगड आणि कळसूबाई परिसरातील डोंगरदऱ्यांतून असंख्य धबधबे कोसळू लागले आहेत.वसुंधरा,नेकलेस,न्हानी,अंब्रेला आणि रिव्हर्स फॉल पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटकांची मोठी गर्दी होत असून भंडारदरा परिसर पुन्हा एकदा पर्यटकांनी फुलून गेलाय. 

गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आणि त्याचा सर्वाधिक परिणाम भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झाल्याचं पाहायला मिळत आहे.शेंडी,रतनवाडी,घाटघर,हरिश्चंद्रगड,कळसूबाई परिसरात निसर्गाने हिरवाईची शाल पांघरली असून डोंगरकड्यांवरून असंख्य धबधबे फेसाळत आहेत.दाट धुके,गार वारे,ढगांमध्ये हरवलेले डोंगर आणि खळखळ वाहणारे ओढे-नाले..असा नयनरम्य नजारा अनुभवण्यासाठी पुणे,मुंबई,नाशिकसह राज्याच्या विविध भागातून पर्यटक मोठ्या संख्येने भंडारदऱ्याकडे धाव घेत आहेत.

Advertisement

नक्की वाचा >> Neet Exam Result : नीट फेरपरीक्षेचा पुण्यातील विद्यार्थ्याला फटका, रँकमध्ये मोठी घसरण, पालक कोर्टात जाणार

वसुंधरा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू

धबधब्याखाली चिंब भिजण्याचा आनंद घेत सेल्फी आणि रील्सचीही पर्यटकांमध्ये अक्षरशः स्पर्धा पाहायला मिळत आहे. जवळपास शंभर फूट उंचीवरून कोसळणारा वसुंधरा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. तर नेकलेस फॉल, न्हानी फॉल,अंब्रेला फॉल आणि रिव्हर्स फॉलही पर्यटकांना अक्षरशः मोहून टाकत आहेत.विशेष म्हणजे अंब्रेला फॉल हा विल्सन धरणाच्या पाण्याच्या विसर्गानंतर तयार होणारा हंगामी धबधबा असून जुलै ते ऑक्टोबर या काळातच त्याचं मनमोहक रूप पाहायला मिळतं. 

भंडारदरा परिसरात वाहनांच्या लागल्या रांगा

अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनदायिनी मानल्या जाणाऱ्या भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे पाण्याची आवक वाढू लागली असून परिसरातील नद्या,ओढे आणि धबधबे पुन्हा जिवंत झाले आहेत.विकेंड असल्याने भंडारदरा परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या असून स्थानिक पर्यटन व्यवसायालाही याचा मोठा फायदा होत आहे.मात्र प्रशासनाने पर्यटकांना धबधब्याच्या पाण्यात खोलवर न उतरण्याचे,सुरक्षित अंतर राखण्याचे आणि सेल्फीच्या नादात जीव धोक्यात न घालण्याचे आवाहन केले आहे.

नक्की वाचा >> Pune News : पुण्यातील 'या' नगरपालिकेत नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांचे कार्यालय सील, राजकीय वर्तुळात खळबळ

कारण डोंगराळ भागात पावसाचा जोर अचानक वाढल्यास पाण्याचा प्रवाहही क्षणार्धात वाढू शकतो.एकीकडे पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत असतानाच दुसरीकडे भंडारदरा परिसर पुन्हा एकदा निसर्गप्रेमी आणि पर्यटकांनी गजबजून गेला आहे.पुढील काही दिवस मान्सून अधिक सक्रिय राहण्याचा अंदाज असल्याने या परिसरातील धबधब्यांचे सौंदर्य आणखी खुलण्याची शक्यता आहे.