Maha Shivratri 2026: महाशिवरात्रीचा उत्सव म्हणजे भगवान शंकराच्या उपासनेचा सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. यंदा 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर येथे भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आलीय. बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्यपीठ म्हणून ओळख असलेले हे पवित्र क्षेत्र महाशिवरात्रीला 'बम बम भोले'चा जयघोष करत भक्तांनी गजबजून जाणार आहे.
मंदिर 24 तास खुले राहणार
महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिर रविवारी पहाटे 4 वाजेपासून ते सोमवारी रात्री 9 वाजेपर्यंत अखंड दर्शनासाठी खुले राहणार आहे. लाखो भाविकांच्या संभाव्य गर्दीचा अंदाज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
व्हीआयपी दर्शन बंद
महाशिवरात्रीला व्हीआयपी प्रोटोकॉल दर्शन, देणगी दर्शन आणि गर्भगृह दर्शन पूर्णपणे बंद राहणार आहे. सर्वसामान्य भाविकांना समान संधी देण्यासाठी संस्थानने हा निर्णय घेतला आहे.
प्रवेश व्यवस्था
- पूर्व दरवाजा दर्शन बारी येथून सर्व भाविकांना प्रवेश देण्यात येणार आहे.
- 14 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारीदरम्यान सकाळी मंदिर उघडल्यापासून सकाळी 10.30 वाजेपर्यंत स्थानिक गावकऱ्यांना विशेष सवलत देण्यात आली आहे.
- गावकरी पश्चिम दरवाजाने ओळखपत्र दाखवून प्रवेश करू शकतील.
- दर्शनानंतर दक्षिण गेटने बाहेर पडावे लागेल, ही सुविधा केवळ स्थानिकांसाठीच असेल.
सुरक्षा आणि सुविधा
- त्र्यंबकेश्वर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात राहणार असून संस्थानचे सुरक्षारक्षकही त्यांच्या मदतीला असतील.
- मंदिर परिसरात सीसीटीव्ही देखरेख ठेवली जाणार आहे.
- पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
- आरोग्य पथक तैनात राहणार आहे.
- प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
- मंदिर आकर्षक स्ट्रक्चरल विद्युत रोषणाईने सजवण्यात आले आहे.
- गर्भगृह, सभामंडप, उत्तर आणि पूर्व महाद्वार फुलांनी सुशोभित केले जाणार आहेत.
- महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंदिर परिसर दिव्यतेने उजळून निघणार आहे.
पालखी सोहळा
- 15 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता त्र्यंबकराजांची पालखी मंदिरातून निघेल.
- ती परंपरागत मार्गाने तीर्थराज कुशावर्त येथे जाईल. तेथे षोडशोपचार पूजा होईल.
- संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पालखी पुन्हा मंदिरात परतेल. संध्याकाळी 5 वाजता लघुरुद्र अभिषेक होईल. रात्री 11 वाजता महापूजा आणि अंतर्गत पालखी सोहळा पार पडेल.
सांस्कृतिक कार्यक्रम
14 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजेपासून ते रात्री 9.30 वाजेपर्यंत या वेळेत श्रीधर फडके यांचा "गीत रामायण" कार्यक्रम होईल.
16 फेब्रुवारी रोजी विविध कथ्थक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
महादेवाला प्रसन्न करण्यासाठी काय करावे?
- महाशिवरात्रीला उपवास करण्याला विशेष महत्त्व आहे.
- पूर्ण उपवास किंवा फलाहार केला जाऊ शकतो.
- पहाटे उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
- घरात किंवा मंदिरात शिवलिंगाची पूजा करावी.
- शिवलिंगावर जलाभिषेक करावा. दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचा पंचामृत अभिषेक करावा.
- बिल्वपत्र अर्पण करावे.
- धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावा.
- "ॐ नमः शिवाय" मंत्राचा जप करावा. महाशिवरात्रीची रात्र जागरणाची असते.
- चार प्रहरांची पूजा केल्यास विशेष पुण्य मिळते.
- पहिल्या प्रहरात जलाभिषेक, दुसऱ्या प्रहरात दुधाभिषेक, तिसऱ्या प्रहरात तुपाचा अभिषेक, चौथ्या प्रहरात मधाचा अभिषेक करावा.
उपवासाचे नियम
- कांदा-लसूण खाणे टाळावे.
- सात्त्विक आहार घ्यावा.
- मन शुद्ध ठेवावे.
- राग, मत्सर टाळावा.
- दान आणि सेवा
- गरीबांना अन्नदान करावे.
- गाईला चारा द्यावा.
- गरजूंची मदत करावी.
महाशिवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व
- महाशिवरात्रीचे रात्र आत्मचिंतनाची आहे. शिव म्हणजे कल्याण.
- अहंकाराचा त्याग करून भक्तिभाव ठेवावा. महाशिवरात्री म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि संयमाचा उत्सव.
- त्र्यंबकेश्वरात महादेवाच्या दर्शनाने आयुष्य धन्य होते, सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)