Maharashtra DA Hike 2026: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी यंदाची होळी खऱ्या अर्थाने रंगात न्हाऊन निघणार आहे. महागाईच्या काळात दिलासा देणारी एक मोठी बातमी समोर आली असून राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) 3 टक्क्यांची वाढ केली आहे. या निर्णयामुळे आता कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता 55 टक्क्यावरून 58 टक्के झाला आहे.
ही वाढ 1 जुलै 2025 पासून लागू करण्यात आली असली, तरी फेब्रुवारी 2026 च्या पगारात ती रोखीने जमा होणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पगारातील वाढीचे साधे गणित
महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ झाली म्हणजे नक्की किती रुपये वाढणार, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. याचे गणित अत्यंत सोपे आहे. जर तुमचा मूळ पगार 30,000 रुपये असेल, तर तुमच्या मासिक पगारात 900 रुपयांची वाढ होईल. तसेच 8 महिन्यांची थकबाकी म्हणून 7,200 रुपये मिळतील. ज्यांचा मूळ पगार 45,000 रुपये आहे, त्यांच्या पगारात 1,350 रुपयांची वाढ होऊन 10,800 रुपयांची थकबाकी जमा होईल.
60,000 रुपये मूळ पगार असणाऱ्यांना 1,800 रुपये मासिक वाढ आणि 14,400 रुपये थकबाकी मिळेल. 75,000 रुपये पगार असल्यास 2,250 रुपये वाढ आणि 18,000 रुपये थकबाकी, तर 90,000 रुपये मूळ पगार असणाऱ्यांना 2,700 रुपये मासिक वाढ आणि 21,600 रुपयांची थकबाकी मिळणार आहे.
( नक्की वाचा : DA Hike 2026 : सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी आता होळीलाच, थकबाकी आणि वाढीव भत्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर )
एका उदाहरणातून समजून घेऊया बदल
समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 50,000 रुपये आहे. जुन्या 55 टक्के दरानुसार त्यांना 27,500 रुपये महागाई भत्ता मिळत होता. आता नवीन 58 टक्के दरानुसार हा भत्ता 29,000 रुपये होईल. म्हणजेच त्यांच्या हातात दरमहा 1,500 रुपये अतिरिक्त येतील.
या मासिक वाढीसोबतच मागील 8 महिन्यांची थकबाकी एकत्र मिळाल्यास खिशात एक मोठी रक्कम जमा होणार आहे, ज्यामुळे सणासुदीचा आनंद द्विगुणित होईल.
( नक्की वाचा : Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेचा रिजेक्ट झालेला अर्ज पुन्हा होईल मंजूर; फक्त फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स )
कुणाला होणार फायदा?
सरकारने या वाढीव पैशांच्या नियोजनाबाबतही स्पष्टता दिली आहे. जुलै ते ऑक्टोबर 2025 या चार महिन्यांची थकबाकी गुढीपाढव्याच्या मुहूर्तावर म्हणजेच मार्च 2026 मध्ये दिली जाणार आहे. उर्वरित नोव्हेंबर ते जानेवारी या महिन्यांच्या थकबाकीबाबतचे आदेश स्वतंत्रपणे काढले जातील.
याचाच अर्थ असा की, होळीला वाढीव पगार आणि गुढीपाढव्याला थकबाकीची मोठी रक्कम, अशी दुहेरी मेजवानी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील सुमारे 5 लाख 96 हजार शासकीय कर्मचारी आणि 8 लाख 72 हजार निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे.