Maharashtra Govt Employees DA Hike 2026 : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होळीच्या मुहूर्तावर आनंदाची बातमी समोर आली आहे. महागाईच्या काळात दिलासा देण्यासाठी सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55 टक्क्यांवरून वाढून थेट 58 टक्के इतका झाला आहे.
वित्त आणि नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी बुधवारी विधान परिषदेत या निर्णयाची अधिकृत घोषणा केली असून यामुळे केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता एकाच पातळीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महागाई भत्त्यातील ही वाढ पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे 1 जुलै 2025 पासून लागू केली जाणार आहे. राज्य सरकार नेहमीच आपल्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असून त्यांच्या आर्थिक सुरक्षेला प्राधान्य देते, असे मत आशिष जयस्वाल यांनी यावेळी व्यक्त केले. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून ते राज्याच्या विकासात अधिक जोमाने योगदान देतील, असा विश्वासही सरकारने व्यक्त केला आहे. या संदर्भातील शासन निर्णयही तातडीने निर्गमित करण्यात आला आहे.
( नक्की वाचा : Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेचा रिजेक्ट झालेला अर्ज पुन्हा होईल मंजूर; फक्त फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स )
थकबाकी कधी मिळणार?
वाढीव महागाई भत्त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी 2026 पासून रोखीने मिळण्यास सुरुवात होईल. मात्र, जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या चार महिन्यांच्या कालावधीतील थकबाकीची रक्कम गुढीपाढव्याच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच मार्च 2026 मध्ये दिली जाणार आहे.
नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीतील थकबाकीबाबतचे आदेश सरकारकडून स्वतंत्रपणे काढले जातील. सणासुदीच्या काळात ही थकबाकी मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या खिशात मोठी रक्कम जमा होणार आहे.
(नक्की वाचा : राज्याला मिळाले 11 अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि 69 तहसीलदार; तुमच्या तालुक्याचे नाव आहे का? एकदा वाचाच! )
लाखो कर्मचाऱ्यांना फायदा
या निर्णयाचा फायदा राज्यातील सुमारे 5 लाख 96 हजार शासकीय कर्मचाऱ्यांना होणार आहे. याशिवाय, सुमारे 8 लाख 72 हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही या वाढीव भत्त्याचा लाभ मिळणार आहे.
पेन्शनधारकांसाठीही ही मोठी आनंदाची बातमी मानली जात आहे. होळीच्या निमित्ताने मिळालेली ही भेट सरकारी तिजोरीवर आर्थिक भार टाकणारी असली तरी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.
आठव्या वेतन आयोगाच्या हालचाली
राज्य कर्मचाऱ्यांना ही खुशखबर मिळालेली असतानाच केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठीही एक मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आता आठव्या वेतन आयोगाचे काम सुरू झाले आहे. या आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे येणाऱ्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत आणखी सुधारणा होण्याची चिन्हे दिसत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world