Mobile Charging Facility In Pandharpur Wari : आषाढी वारीच्या अध्यात्मिक प्रवासाला यंदा हरित ऊर्जेची साथ मिळाली आहे. लाखो वारकऱ्यांना वारीदरम्यान कुटुंबीयांशी अखंड संपर्क ठेवता यावा आणि आपत्कालीन प्रसंगी मोबाईलचा वापर सहज करता यावा, यासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) यांनी पालखी सोहळ्यात सहभागी दिंडींसाठी सौरऊर्जेवर आधारित मोबाईल चार्जिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. स्वच्छ ऊर्जा, आधुनिक तंत्रज्ञान आणि वारकरी सेवेला एकत्र आणणारा हा अभिनव उपक्रम वारीमध्ये विशेष आकर्षण ठरत असून, अक्षय ऊर्जेच्या लोकाभिमुख वापराचे प्रभावी उदाहरण म्हणूनही पुढे येत आहे.
आषाढी वारी 2026 निमित्त राज्यभरातून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत सहभागी होणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांची सुविधा लक्षात घेऊन महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) मार्फत सोलर मोबाईल चार्जर संच 25 जुलै 2026 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या उपक्रमाद्वारे वारकऱ्यांना वारीदरम्यान मोबाईल चार्ज करण्याची स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि सुलभ सुविधा उपलब्ध झाली आहे.
नक्की वाचा >> Pandharpur News : वारकऱ्यांसाठी अलर्ट! पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसरात महिला चोरांची टोळी सक्रिय, CCTV Video
आपत्कालीन परिस्थितीतही मोबाईचा वापर
वारीच्या प्रदीर्घ प्रवासादरम्यान वारकऱ्यांना कुटुंबीयांशी सातत्याने संपर्क ठेवता यावा, आवश्यक माहितीची देवाणघेवाण करता यावी, तसेच आपत्कालीन परिस्थितीत मोबाईलचा वापर करता यावा, या उद्देशाने महाऊर्जाने पालखी सोहळ्यासमवेत दिंडींना सौरऊर्जेवर आधारित मोबाईल चार्जर संच उपलब्ध करून दिले आहेत. या संचांमुळे पारंपरिक वीजेवरील अवलंबित्व कमी होऊन अक्षय ऊर्जेचा प्रभावी वापर होत आहे.
नक्की वाचा >> Pune News: मोशी दुर्घटना, 40 तास उलटले, 'त्या' लोकांचा श्वास अजूनही कोंडलेलाच, रेस्क्यू टीमने आखलाय मोठा प्लॅन
महाऊर्जा राज्य शासनाच्या अक्षय ऊर्जा व ऊर्जा संवर्धन धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असून, आषाढी वारीतील हा उपक्रम स्वच्छ, हरित व शाश्वत ऊर्जेच्या प्रसारासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. वारकऱ्यांना प्रत्यक्ष सुविधा उपलब्ध करून देतानाच सौरऊर्जेच्या वापराबाबत जनजागृती करण्याचाही उद्देश या माध्यमातून साध्य होत आहे. आषाढी वारीच्या सोहळ्यात वारकऱ्यांच्या सेवेसाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम अक्षय ऊर्जेच्या लोकाभिमुख वापराचे प्रभावी उदाहरण असून, वारकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाऊर्जामार्फत करण्यात आले आहे.