आता शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी अन् कर्ज चुकवण्याची अटही संपली; वाचा नव्या निर्णयाची A to Z माहिती

Maharashtra Farm Loan Waiver: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी एका मोठ्या कर्जमाफीची घोषणा केली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Maharashtra Farm Loan Waiver: सरकारने केवळ कर्जमाफीची रक्कमच वाढवली नाही, तर ...
मुंबई:

Maharashtra Farm Loan Waiver: राज्य सरकारने राज्यातील बळीराजासाठी एक ऐतिहासिक आणि अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी एका मोठ्या कर्जमाफीची घोषणा केली आहे. महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा विस्तार करत सरकारने आता शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. 

यापूर्वी या योजनेअंतर्गत केवळ 50000 रुपयांपर्यंतच्या प्रोत्साहनपर लाभाची तरतूद होती, मात्र आता ती वाढवून थेट 2 लाख रुपये करण्यात आली आहे. यासोबतच कर्ज फेडण्याची जाचक अटही सरकारने पूर्णपणे रद्द केली असून यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Advertisement

कर्ज चुकावण्याची जाचक अटही संपवली

सरकारने केवळ कर्जमाफीची रक्कमच वाढवली नाही, तर शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा करताना सांगितले की, प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी 2026-27 या वर्षातील पीक कर्ज वेळेत फेडण्याची जी अट घालण्यात आली होती, ती आता पूर्णपणे रद्द करण्यात येत आहे. या अटीमुळे अनेक शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती होती, मात्र आता अट काढल्याने सर्व पात्र शेतकऱ्यांना याचा थेट लाभ घेता येणार आहे.

( नक्की वाचा : '1000 खोटारडे मेल्यानंतर हे जन्माला आले असतील'! Missing Link वरील प्रत्येक आरोपाला मुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर )

या ऐतिहासिक निर्णयामागची भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कर्जमाफीमुळे कोणताही शेतकरी श्रीमंत होत नाही, पण अडचणीच्या काळात तो सावकाराच्या दारात जाण्यापासून नक्कीच वाचतो. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढणे हेच या सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी महायुती सरकारने पाऊल उचलले आहे. सरकारला वाटले असते तर हा निर्णय 2029 पर्यंत पुढे ढकलला जाऊ शकला असता, पण शेतकऱ्यांची सद्यस्थिती पाहता आम्ही आताच हा निर्णय घेण्याचे निश्चित केले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचे आंदोलन आणि आमदारांच्या दबावाचा परिणाम

शेतकऱ्यांच्या या कर्जमाफीसाठी आणि अटी शिथिल करण्यासाठी महायुतीचे अनेक आमदार सातत्याने सरकारकडे मागणी करत होते. आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली आमदारांच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती. दुसरीकडे, या अटींविरोधात राज्यभरातून शेतकऱ्यांनी मोठे मोर्चे आणि आंदोलने केली होती. आमदार रोहित पवार यांनीही शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी उपोषण केले होते. या सर्व जनआंदोलनांची आणि दबावाची गंभीर दखल घेत सरकारने आपल्या नियमांवर पुनर्विचार केला आणि हा शेतकरी हिताचा निर्णय जाहीर केला.

Advertisement


( नक्की वाचा : पोटातून गोळी काढली, एका किडनीवर जिवंत ठेवले; कालपर्यंत पाया पडणारे Ramesh Mhatre आज डॉक्टरांच्याच जीवावर उठले! )

लाखो शेतकऱ्यांना मिळणार थेट फायदा

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 2019 च्या कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांना या निर्णयाचा थेट फायदा मिळणार आहे. राज्यातील 95 टक्के शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जाचे हप्ते भरले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. आता 2026 मध्ये कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांशिवाय, मागील 3 वर्षांपैकी किमान 2 वर्षे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल. महाराष्ट्राच्या इतिहासात अशा प्रकारचा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला असल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे सांगितले की, सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासोबतच राज्यातील बँकिंग व्यवस्था मजबूत ठेवण्यावरही लक्ष केंद्रित करत आहे. याशिवाय, राज्य सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना सुमारे 25000 कोटी रुपयांची वीज बिल सवलतही देत आहे, अशी आठवण त्यांनी करून दिली. सरकारच्या या निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल आणि शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी एक भक्कम आर्थिक आधार मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
 

Advertisement