Maharashtra pilgrimage development 115 crore rupees: राज्यातील समृद्ध संतपरंपरेचा आणि आध्यात्मिक वारशाचा सन्मान करत धार्मिक पर्यटनाला मोठी चालना देण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासावर भर देत विविध विकासकामांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या शिखर समितीच्या बैठकीत यासंदर्भातील महत्त्वपूर्ण आराखड्यांना मंजुरी देण्यात आली आहे.
115 कोटींच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत तीन प्रमुख तीर्थक्षेत्रांच्या सुधारित विकास आराखड्यांना एकूण 115 कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी देण्यात आली आहे. उत्सव आणि यात्रेच्या काळात येणाऱ्या भाविकांची मोठी संख्या लक्षात घेऊन ही सर्व कामे दर्जेदार पद्धतीने, टप्प्याटप्प्याने आणि निश्चित वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी यंत्रणांना दिले आहेत. भाविकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्याने स्थानिक अर्थव्यवस्था, रोजगार आणि पर्यटनालाही मोठी गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
परभणीतील श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्रासाठी 48.55 कोटी
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्रासाठी 48.55 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून संत जनाबाई यांच्या जन्मस्थळ परिसरात सांस्कृतिक सभागृह, गोदावरी घाट विकास, दर्शन मंडप, उद्यान, सुशोभीकरण, पाथवे, मंदिर ते घाटापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता, गोरक्षण इमारत, संरक्षक भिंत, जलनिस्सारण व्यवस्था, सौरऊर्जा आणि सीसीटीव्ही यांसारख्या विविध सुविधा उभारल्या जातील. यामुळे गंगाखेड हे वारकरी आणि भाविकांसाठी एक प्रमुख आध्यात्मिक केंद्र म्हणून विकसित होणार आहे.
( नक्की वाचा : Pune News: पुणे शहरात जड वाहनांना नो-एन्ट्री! मुंबई, सोलापूरसह प्रमुख महामार्गांचे रूट बदलले, वाचा सविस्तर )
अमरावतीच्या श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळासाठी 25 कोटी
अमरावती येथील श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ विकासासाठी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या कामांत श्री संत गाडगे महाराज स्मृती केंद्र, शेतकरी ग्राम सफाई मिशन सेंटरच्या तळमजल्याचे काम, यात्री निवासाचे उर्वरित मजले, कीर्तन सभागृह, समाधीचा जीर्णोद्धार आणि सुशोभीकरण यांचा समावेश आहे. याशिवाय कुंताबाई समाधी परिसर सौंदर्यीकरण, ध्यान केंद्र इमारत, अंतर्गत रस्ते आणि पार्किंग व्यवस्थाही या निधीतून केली जाणार आहे.
काटोल येथील चक्रधर स्वामी मंदिर परिसरासाठी 41.75 कोटी
नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील महानुभाव पंथाचे ऐतिहासिक श्रद्धास्थान असलेल्या भगवान श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसरासाठी 41.75 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. या आराखड्यात बहुउद्देशीय सभागृह, भव्य प्रवेशद्वार, कमानी पूल, वाहनतळ, बगीचा, संरक्षक भिंत आणि आधुनिक सार्वजनिक प्रसाधनगृहांची निर्मिती केली जाईल. यामुळे महानुभाव पंथाच्या या पवित्र स्थळी धार्मिक पर्यटनाला मोठा पाठबळ मिळणार आहे.