रामराजे शिंदे, दिल्ली:
Marathi Hindi Controversy: राज्यात सध्या मराठी- हिंदीचा वाद सुरु आहे. मराठीवरुन मनसेने आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये हिंदीची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा थेट इशाराच राज ठाकरेंनी दिला आहे. अशातच आता राज ठाकरे यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुंबईतील वकील घनश्याम दयालू उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
Raj Thackeray : मुंबई गुजरातला जोडण्याचा डाव, बाहेरची माणसं... राज ठाकरेंचा खळबळजनक आरोप
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात एफआयआर दाखल करा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ललिता कुमारी प्रकरणाच्या निर्णयात जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांची देशभरात सर्वोच्च न्यायालयाकडून अंमलबजावणी करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. ललिता कुमारी निर्णयात जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला द्यावेत अशी सर्वोच्च न्यायालयाला विनंती या याचिकेतून करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे मुंबईतील वकील घनश्याम दयालू उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते इतर राज्यांमधून येणाऱ्या लोकांवर हिंसाचार करतात आणि भाषेच्या आधारावर राजकारण करतात, जे संविधानाच्या मूळ भावनेच्या आणि कुमारी निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या विरुद्ध आहे, असं या याचिकेत म्हटलं आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करावा आणि राज्य सरकार आणि योग्य अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. या याचिकेत महाराष्ट्र सरकार आणि भारतीय निवडणूक आयोगासह इतर अधिकाऱ्यांना पक्षकार करण्यात आले आहे. याबाबत सुनावणी कधी होणार? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.