मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांचे नरकातील स्वर्ग हे पुस्तक सध्या चांगलेच चर्चेत आहे. महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून ते शिंदे गट, अजित पवारांच्या बंडापर्यंतच्या राजकीय घडामोडींवर यामध्ये परखडपणे भाष्य करण्यात आले आहे. एकीकडे या पुस्तकावरुन राजकारण तापले असताना, महायुतीकडून जोरदार टीका होत असतानाच संजय राऊत यांनी केलेल्या नव्या दाव्याने खळबळ उडाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणालेत संजय राऊत?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर संजय राऊत यांचे नरकातील स्वर्ग हे पुस्तक वाटत असल्याचा फोटो शेअर केला होता. लपवण्यासारखं काहीही नाही असा खास कॅप्शनही त्यांनी या फोटोला दिला होता. हाच फोटो रिपोस्ट करत संजय राऊत यांनी एक महत्त्वाचा दावा केला आहे. अरे व्वा, हे पुस्तक सगळ्यांसाठी आहे, आतापर्यंत मला 27 भाजपा आमदारांचे फोन आले 'नरकातला स्वर्ग' एका बैठकीत वाचून काढले हे सांगण्यासाठी, असं संजय राऊत यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
याआधी संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह राज्यातील अनेक बड्या नेत्यांना हे पुस्तक वाचणासाठी भेट म्हणून दिले होते. शिंदे व सुरत गौहाटी ला गेलेल्या त्यांच्या सर्व मंडळीनी हे पुस्तक जरूर वाचावे, असे आवाहनही त्यांनी केले होते.
दरम्यान, 17 मे रोजी मुंबईमध्ये संजय राऊत यांच्या या पुस्तकाचे प्रकाशन झाले. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर, शरद पवार, यांच्यासह अनेक दिग्गज यावेळी उपस्थित होते. राऊतांचे हे पुस्तक समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात टीका टिप्पण्या अन् आरोपांचे राजकारण रंगल्याचेही पाहायला मिळाले.