Maharashtra Politics: गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगरची चर्चा आहे. आता हे ऑपरेशन टायगर अखेरच्या टप्प्यात आल्याचं सांगण्यात येत असून जून महिन्यात ठाकरेंचे खासदार फुटणार असल्याचे बोलले जात आहे. दोन दिवसांपूर्वी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत अनेक खासदार प्रत्यक्ष अनुपस्थित राहिले त्यावरुन या चर्चांना उधाण आले आहे, अशातच संजय राऊत यांनी केलेल्या एक ट्वीटने खळबळ उडाली आहे.
संजय राऊतांचं ट्वीट, ऑपरेशन टायगरची चर्चा
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे त्याआधी ठाकरे गट फुटणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे प्रमुख नेते मात्र सर्व खासदारसोबत असल्याचा दावा करत आहेत. मात्र मातोश्रीवरील बैठकीला अनुपस्थित असलेल्या खासदारांनी दिलेली कारणे आणि संजय राऊतांनी सांगितलेल्या माहितीमध्ये मोठी तफावत आढळून आली त्यामुळे ठाकरे गटात 'ऑल इज नॉट वेल'' अशी परिस्थिती असल्याची चर्चा आहे. अशातच संजय राऊतांनी एक महत्त्वाचं ट्वीट केलं आहे.
तृणमुल काँग्रेसच्या फुटीर खासदारांचा दाखला देत संजय राऊतांनी महाराष्ट्रातील फुटीबाबत महत्त्वाचे भाष्य केले आहे. हास्य जत्रा! हे महाशय आहेत शिऊ कुंडू. नेशनलिस्ट सिटिज़न पार्टी चे संस्थापक अध्यक्ष,(त्रिपुरा) यांच्याच “पार्टी "त तृणमूलच्या २२ खासदारांनी स्वतःला विलीन करून घेतले. महाराष्ट्रातील फुटीरांना देखील अशाच एका कुंडू चा शोध घ्यावा लागेल, घटनेतील १० वे अनुच्छेद तेच सांगतेय, जय हो.. असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊतांनी केलेलं हे ट्वीट म्हणजे महाराष्ट्रात होणाऱ्या संभाव्य फुटीवर शिक्कामोर्तब केलं आहे का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.