गुरु दळवी, प्रतिनिधी:
Malvan Rajkot Fort Closed: सिंधुदुर्गला जाणाऱ्या पर्यटकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मालवणमधील राजकोट किल्ला आजपासून पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चबुतराच्या सभोवताली पदपथाच्या (Paving) आवश्यक दुरुस्तीसाठी व इतर अनुषंगिक कामे पुर्ण होईपर्यंत रविवार २२ जून पासून राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. अशी माहिती कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांच्या वतीने देण्यात आली आहे. तसे पत्रही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने जारी करण्यात आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
समोर आलेल्या माहितीनुसार, मालवण मधील राजकोट किल्ला आजपासून (रविवार, 22 जून) पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे.राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाजूला नुकतीच चौथर्याच्या बाजूची जमीन खचली होती. चौथऱ्याच्या परिसरातील दुरुस्ती काम करण्यासाठी हा किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार वैभव नाईक यांनी नाराजी व्यक्त करत टीका केली आहे.
मागच्या वेळेला जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला तसा पुन्हा पुतळ्याच्या आजूबाजूचा भाग कोसळेल या भीती मुळेच किल्ला बंद ठेवण्यात आला आहे का? असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. शंभर कोटी रूपये खर्च करून शंभर वर्ष टीकेल असे पुतळ्याचे काम केल्याचे सरकार सांगत असताना अशा प्रकारे बंदी आणली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अजूनही लक्ष घालून जे अधीकारी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहीजे अशी मागणी सुद्धा वैभव नाईक यांनी केली आहे.
नक्की वाचा - Beed Crime : मुलगा जिवंत हवा असेल तर 50 हजार टाका, अन्यथा... बीडमधील धक्कादायक प्रकार